शनिवार, १९ डिसेंबर, २००९

डॅम इट !

"अरे नगमा, दिपीका सारख्यांपासुन तो कोण तो बिहारी नट, त्यांच्या नावाचा तिकिटासाठी विचार होतो आणी मराठीतील एका कलाकरालाच्या नावाची अफवा सुद्धा उठत नाही म्हणजे काय ?" महेश कोठारे तावातावाने बोलत होता. काहि वेळाने धाप लागल्यावर परत एकदा 'डॅम इट' म्हणुन तो खाली बसला.

"अरे बाबा त्यांच्या नावाला ग्लॅमर असत रे ! कळतय का तुला ?" स्मिता तळवळकर महेशला समजावत्या झाल्या.

"का ? माझ्या श्वास चित्रपटाला ग्लॅमर न्हवते ? ऑस्कर पर्यंत वारु दौडला की त्याचा !" संदिप सावंतानी हिरिरिने आपला मुद्दा मांडला.

"डॅम इट ! घरघर लागायची वेळ आलीये आता. काहितरी केलेच पाहिजे. ह्या राजकिय अभिसरणाच्या प्रक्रियेत आपणही उतरलेच पाहिजे." जोग सरांच्या चिरंजीवांसाठी चित्रपट काढल्यापासुन महेशराव फारच अगम्य बोलायला लाग्ले आहेत.

"तसा मला नगरपाल पदाचा राजकीय अनुभव आहेच. काय म्हणता ?" किरण शांताराम अंदाज घेत म्हणाले.

"अहो तुम्हाला आता कशाला उद्याची बात चे रिमिक्स सहन होत नाही, तुम्ही स्वत:चे रिमिक्स कसे सहन करणार राजकारणात ?" देशाला मराठी नेतृत्व कसे खंबीर हवे ! आमच्या अजिंक्य सारखे. काय देखणा आणी करारी दिसलाय तो 'वासुदेव बळवंत' मध्ये." इती रमेश देव.

"आमचा सुशांतसुद्धा देखणा आणी करारीच आहे म्हणले" किरणरावांचा संयम आता सुटायला लागला होता.

अचानक जोरात टेबल ठोकल्याचा आवाज झाला. सर्वांनी बघितले तर जयश्रीताई हातानी सगळ्यांना गप्प बसायला सांगत होत्या. गंमत काय झाली होती, की त्या गेले अर्धा तास बोलण्यासाठी तोंड उघडत होत्या पण त्यांच्या तोंडातुन शब्द बाहेर पडेपर्यंत त्या जांभई देत आहेत समजुन दुसराच कोणीतरी बोलायला सुरुवात करत होता.

"अशी असावी सासु नंतर एका मुत्सद्दी आणी खंबीर स्त्री ची प्रतिमा बनली आहे माझी." एकदाचा त्यांचा आवाज बाहेर आला.

"बाई अहो मग असे असेल तर आम्ही तुमच्या चार काय चारशे पावले पुढे हाये म्हणायचे की तिच्यामायला." कोपर्‍यातुन निळुभाउ म्हणाले.

"माझ्या मते आपण एक भक्कम पाठींबा असलेल्या आणी सामान्य जनतेच्या मनापर्यंत पोचलेल्या स्त्रीला निवडणुकीला उभे करावे. मी आणी तळवळकर जीम ह्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न करु. संजय सुरकर साथीला असेलच." स्मिताताई म्हणाल्या.

"पण स्त्रीच का ? एखादा पुरुष सुद्धा ह्या किंवा ह्यापेक्षा जास्ती गुणांनी युक्त असु शकतो. आणी आधार म्हणाल तर आज मी एकट्याच्या जिवावर अख्खा सिनेमा ओढुन नेतोय." एकदाचे अनासपुरे रेकले.

"ह्या सगळ्या गुणांनी आम्हे सुद्धा युक्त आहोत." भरत जाधव.

"च्यायला श्रीखंडाची जाहिरात एकल्या सारखे वाटले." निळुभाउ.

"हे बघा, जनतेच्या हिताचे आणी योग्य निर्णय राबवु शकेल असा माणुस तिकडे गेला पाहिजे. जेष्ठ असेल तर अजुनच उत्तम" श्रीराम लागु म्हणाले.

"निवडणुक लढवायची आहे 'काचेचा चंद्र' पुन्हा रंगभुमीवर आणायचे नाहिये डॉक्टर." जयश्रीताई पुन्हा बोलत्या झाल्या.

" मी काय म्हणतो..." महेश.

"काहि म्हणु नका. आधीच तो जबरदस्त काढुन डोक्याला त्रास दिला आहेत तेव्हडा बास नाहिये का ?" स्मिताताई.

'कॉलेजच्या गोष्टी' काढण्यापेक्षा ते बरे नाही का ? महेश.

"विमानाच्या तिकिटाशिवाय उदघाटनाला यायला जमणार नाही म्हणणारे आता जनतेची सेवा करणार म्हणे." किरण शांताराम.

वैयक्तीक आरोप प्रत्यारोप चालु असतानाच अचानक हॉल मध्ये शांतता पसरली. १० मिनिटांनी आम्ही आत डॉकावुन पाहिले तो हॉल रिकामा ! सेवकाकडे विचारणा करता असे कळाले की 'नाना' येतोय म्हणुन फोन आला होता म्हणे.

संदर्भ :- काहि काळापुर्वी शिरीष कणेकर ह्यांनी मराठी निर्माते 'टायटॅनीक' वरुन मराठी चित्रपट काढण्याचे ठरवतात असा एक छोटेखानी विनोदी लेख लिहिला होता. त्या लेखाच्या आधारे हा निवडणुक तिकिटाचा प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न केला आहे.

पॉंटिंग पॉंटिंग

पॉंटिंग नावाच्या वाचाळ प्राण्याने सुनिल गवासकर ह्यांच्या वर केलेल्या टिकेविषयी आपण वाचले असेलच. बर्‍याच मान्यवरांनी ह्या विषयावर भाष्य टाळले. परंतु काहि माजी भारतीय कर्णधारांच्या दैनंदिनीत मात्र ह्या विषयी बरेच लिहिलेले आढळले. ह्या काहि निवडक प्रतीक्रिया.

बिशन सिंग बेदी :-

ओये होये मुंडे मे बडा दम हैगा ! बर्‍याच वर्षानी का होइना पण कोणीतरी त्याला आरसा दाखवल बरे झाले. देवदूत कसला असुर आहे तो ! ह्याला येव्हडे सावरुन घेतले पण शेवटि काय ? ह्यांच्या हाथाखाली आम्हाला खेळायला लावले. माझा सल्ला तरी घ्यायचा होता त्या रिकी नि, मग एका रणजी सामन्यात डाव्या हातानी फलंदाजी करण्यापर्यंत ह्यांची मजल कशी गेली होती ते पण त्याला सांगीतले असते मी. उघड पणे नाही पण रात्री हळुच २ 'पतियाळा' जास्त मारुन मी सेलिब्रेट केलेच.
हो मै बेदी रब रब कर दि हो मै बेदी.

सचिन तेंडुलकर :-

आयला ! खरे बोलला रिक्या अगदी. देवदूत असे नसतातच. सामना चालु व्हायच्या ४ दिवस आधीपासुनच जे मिडीया , जुने खेळाडु ह्यांच्या मदतीने समोरच्या टिम च्या विकेट काढायला सुरुवात करतात, दिवसभर दारुच्या गुत्त्यात हिंडत असल्यासारखे वागत आणी बडबडत असतात, षटकातला शेवटचा चेंडु सरपटी टाकुन प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबुत करतात, ते देवदूत असतात. समोरच्या संघातील सर्वात चांगल्या गोलंदाजाला जे 'चकर' म्हणतात, त्याच्यावर वांशीक टिपणी करतात, जे त्याला अंडी फेकुन मारतात, ते देवदूत असतात. समोरच्या संघातील खेळाडुला जे अतीरेकी म्हणतात ते देवदूत असतात. आणी खरे सांगायचे तर देवदूत फक्त ऑस्ट्रेलीयात जन्माला येतात.

सौरव गांगुली :-

उडी बाबा कि बोल छे. 'गिरे तो भी नाक उपर' असे आहे ह्या ऑस्ट्रेलीया वाल्यांचे. येव्हडा सपाटुन मार दिला तरी माज उतरेना ह्यांचा. हाता पायानी काही करु शकले नाहित आता तोंडानी उजेड पाडत आहेत. त्या लॉर्डस वर कसा शर्ट काढुन फिरवला होता तसा गरा गरा फिरवावेसे वाटत आहे ह्याला. तो माझ्यावर जो जोक फार फ़ेमस झाला होता ना, तो नक्की ह्या ऑस्ट्रेलीया वाल्यांच्या मीडीया मधुन आला असणार. काय तर म्हणे, एकदा ड्रेसिंगरूम मध्ये माझ्या बायकोचा डोना चा फोन येतो, तिला तो थेरडा सांगतो कि सौरव आताच फलंदाजी करायला गेलाय, तर डोना म्हणते "ठिक आहे मी होल्ड करते २ मिनीट." नालायक माणसे, चांगले खडसावले सुनील सरांनी ते बरेच केले. चला आता बास, आज टि.व्हि. वर जुना कार्यक्रम दाखवणार आहेत डोना चा. ( निरखुन पाहिले असता तिथे 'नगमा' खोडुन 'डोना' केलेले आढळले.)


शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

गोष्ट छोटी डोंगरा एवढी



"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या".

कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'.

ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ? सात बार्‍यावरच्या कर्जाच्या नोंदी, सर्कारी बियाणे वाटपाची खरी परिस्थीती, शेतकर्‍यासाठी म्हणुन मिळणारे कर्ज आणी ते मिळवताना येणार्‍या अडचणी, संबंधीत लोकांनी केलेली अडवणुक सगळे अगदी काळजाला हात घालणारे.

शेतकर्‍याच्या प्रश्नाला वाचा फोडणारे म्हणुन बरेच चित्रपट येउन गेले आणी येतील, पण बळीराजाच्या खर्‍या प्रश्नांची आपल्यासमोर मांडणी करणारा चित्रपट म्हणुन 'गोष्ट छोटी डोंगरा एवढीची' दखल निश्चीतच घ्यावी लागेल.

कथेची उत्कृष्ट मांडणी आणी त्याला कलाकारांच्या अभिनयाची तेव्हडीच मिळालेली अप्रतिम साथ हे ह्या चित्रपटाचे वैशीष्ठ्य म्हणता येईल. भरत जाधव आणी मकरंद अनासपुरेचा चित्रपट म्हणले की आजकाल पळुनच जावेसे वाटत होते, अशावेळी मकरंद अनासपुरेचा ह्या चित्रपटातील संयत अनुभव अत्यंत सुखावुन जातो. मकरंदनी नेहमीप्रमाणेच अतिशय समजुन उमजुन हि भुमीका केली आहे. कारकिर्दीत त्याला मिळालेली एक आव्हानात्मक भुमीका असा हिचा उल्लेख करायला हरकत नाही.



नागेश भोसले हा असाच अजुन एक ताकदीचा अभिनेता. देहबोली आणी आवाजाचा पुरेपुर फायदा कसा उठवावा हे ह्या अभिनेत्याकडुन शिकुन घ्यावे. ह्या चित्रपटात त्यानी मकरंदच्या गरीब शेतकरी मित्राची भुमीका साकारली आहे. कुटुंबासाठी धडपडणारा, पैशाची कायमच अडचण असतानाही शहरातुन आपला मित्र मकरंद आलेला बघुन त्याच्यासाठी श्रिखंड आणणारा, कर्जाच्या डोंगराखाली बैल विकावा लागल्यावर स्वत:ला नांगराला जुंपणारा नागेश भोसले काळजात घर करुन जातो.

शेवटी हालाखीच्या परिस्थीतीमुळे आणी कर्जाच्या डोंगराखाली हा नागेश भोसले किटकनाशक पिउन आत्महत्या करतो तो प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा. रात्री उशीरा अडखळत परत आला म्हणुन बायकोची आणी मित्राची बोलणी खाताखाता, "दारु पिउन आला का?" विचारल्यावार नागेश भोसले म्हणतो "दारु नाही, किटकनाशक प्यायलोय..." बास, संपुर्ण थेटरच आपल्या डोळ्याभोवती गरकन फिरल्यासारखे वाटते.



शेतकर्‍याला कर्जासाठी, सरकारकडुन होणार्‍या बियाणे पुरवण्यासाठी वेळोवेळी कसे नाडले जाते, प्रत्येक ठिकाणी टेबलाखालच्या पैशासाठी कशी अडवणुक होते, पावसाचा लहरीपणा, २२/२२ तास गायब असणारी विज ह्या सगळ्याचे विदारक चित्र दिग्दर्शकाने साकारले आहे. चिकुच्या मिळालेल्या ५/- रुपायाच्या सरकारी चेकसाठी ५००/- पेक्षा जास्त पैसे भरुन बॅंकेत शेतकर्‍याला खाते उघडावे लागते हि माहिती ऐकुन तर डोक्याला हात लावायची पाळी येते.

शेवटी जेंव्हा मकरंद अनासपुरे "एक माणुस म्हणून तरी शेतकर्‍याचे अस्तीत्व मान्य करा" असे कळवळुन म्हणतोना तेंव्हा कुठेतरी आपल्याला आपणच गुन्हेगार असल्यासारखे वाटायला लागते.



मकरंद अनासपुरे, कै. निळुभाउ फुले, नागेश भोसले, सयाजी शिंदे, माधवी जुवेकर, मधु कांबीकर अशा उत्तमोत्तम ताकदीच्या कलाकारांचा सुंदर अभिनय ह्या चित्रपटाची जमेची बाजु आहे. चित्रपटात अधुन मधुन वाजणारे शिर्षक गीत मात्र डोक्यात जाते येव्हडाच काय तो चंद्रावर डाग म्हणायचा. आधी हा उपदव्याप अजय - अतुल ह्या संगितकारांचा(?) असावा असे वाटत होते पण नंतर तो शैलेंद्र बर्वे ह्या संगीतकाराचा आहे असे जालावर शोध घेता कळाले.

एकुणच बळीराजाचे खरे वास्तव जाणुन घेण्यासाठी हा चित्रपट निश्चीतच पहा.




शनिवार, २८ नोव्हेंबर, २००९

ट्रॉय



ट्रॉय खरतर एक शोकांतीका म्हणावी का शौर्य कथा असा प्रश्न मला नेहमीच पडत आला आहे. हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय अनुभवांपैकी एक असा अनुभव. हा चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक न राहता ह्या कथेतील एक पात्र बनुन जातो. आपण चित्रपट पाहात नसुन जणु ह्यातील मुख्य व्यक्तीरेखांच्या आजुबाजुला घुटमळतोय असे वाटत राहते.

हि कथा खरे तर स्पार्टाची सौंदर्यवती राणी हेलन आणी तिच्या प्रेमात आकंठ बुडुन तिला पळवुन नेणार्‍या ट्रोजन राजकुमार पॅरीसची प्रेमकहाणी, पण चित्रपटाचे (खरेतर ह्या कथेचे) मुळ नायक बनुन जातात ते पॅरीसचा मोठा भाऊ हेक्टर आणी फक्त स्वपराक्रमाने आपले नाव अजरामर व्हावे ह्या इच्छेने पछाडलेला समुद्रदेवता थेटीसचा पराक्रमी पुत्र अकिलीज.



एरीक बाना हा अभिनेता हेक्टर म्हणुन तर ब्रॅड पिट अकिलीज म्हणुन ह्या भुमीका अक्षरश: जगले आहेत. जसे आजही कर्ण म्हणले की पंकज धिर आठवतो तसेच अगदी ह्या दोघांच्या भुमीकांबरोबर घडते.

All my life I've lived by a code and the code is simple: honor the gods, love your woman and defend your country. Troy is mother to us all. Fight for her! म्हणणारा शुरवीर हेक्टर एका बाजुला आणी Myrmidons! My brothers of the sword! I would rather fight beside you than any army of thousands! Let no man forget how menacing we are, we are lions! Do you know what's waiting beyond that beach? Immortality! Take it! It's yours! म्हणणारा अजिंक्य अकिलीज एका बाजुला. ह्यांचा संग्राम हेच खरे ट्रॉयचे वैशीष्ठ्य.



ट्रॉयची कथा खरेतर अतिशय वळणावळणाची म्हणावी लागेल. दोन राज्यातील शांती स्थापन झाल्यावर स्पार्टाचा राजा मेनेलॉसचा पाहुणचार ट्रॉयचे राजपुत्र हेक्टर आणी पॅरीस उपभोगत असतात. ह्याच काळात पॅरीस स्पार्टाची सौंदर्यवती तरुण राणी हेलनच्या प्रेमात पडतो. वयस्क मेनेलॉसची राणी बनुन राहणारी हेलन देखील आपले हृदय पॅरीसला देऊन बसते. परतीच्या वाटेवर हेक्टरला आपल्या लहान भावाने प्रेमत आंधळे होऊन राणी हेलनला देखील आपल्या बरोबर पळवुन आणले आहे हे कळते. भावाच्या ह्या आंधळ्या कृत्याने ट्रॉयचा विनाश होईल हे ओळखुन तो जहाज परत वळवण्याचे आदेश देतो. कोवळ्या वयातला पॅरीस मात्र हेलन परत गेली तर मी पण तिच्या बरोबर जाईन आणी प्रेमात जीव गमावीन असा हट्ट धरुन बसतो. नाईलाजाने हेक्टर ट्रॉयच्या वाटेवर पुन्हा निघतो. ह्या वेळी हेक्टरच्या तोंडी एक अप्रतीम संवाद आहे, तो पॅरीसला म्हणतो "You say you're willing to die for love but you know nothing about dying and you know nothing about love!"

बंधुप्रेमापुढे शरणागती पत्करलेला हेक्टर ट्रॉयला परत आल्या आल्या आपल्या वडीलांना हेलनला परत पाठवुन द्यायची विनंती करतो, त्याला पुढचा अनर्थ टाळायचा असतो. परंतु राजा प्रायम मात्र तीचा सुन म्हणुन सहर्ष स्विकार करतो. ज्याची भिती हेक्टरला असते नेमके तेच घडते. हेलनला पळवल्याने संतप्त झालेला मेनेलॉस आपला महत्वाकांक्षी भाऊ अगॅमेनॉनच्या सह्हायाने ट्रॉयवर हल्ल्याची तयारी करतो. ह्या युद्धात ग्रीकांच्या बाजुने पुन्हा एकदा समर्थपणे उभा राहणार असतो तो म्हणजे अजिंक्य अकिलीज.



ह्यानंतर कथेला छानसा वेग मिळाला आहे. सगळेच सांगुन मजा घालवत नाही पण अकिलीजचे चिलखत घालुन लढणार्‍या अकिलीजच्या चुलतभावाला हेक्टर अकिलीज समजुन ठार करतो. सुडाने पेटलेला अकिलीज हेल्टरला आव्हान देतो. ह्या दोघांच्यातील अंतीम युद्ध म्हणजे उत्कंठेची परिसीमा आणी ह्या चित्रपटातील अत्युच्च क्षण म्हणावा लागेल.



अपोलो मंदीर एकहाती जिंकल्यानंतर अकिलीज आणी हेक्टर पहिल्यांदा समोरा समोर येतात तो प्रसंग कींवा एक विरुद्ध एक लढतीत अकिलीजने बोगॅरीसची केलेली हत्या हे प्रसंग तर अविस्मरणीयच.



एकदा तरी अनुभवावाच असा हा ग्रीक युद्धाचा आणी ग्रीक कथेचा प्रवास जरुर अनुभवा.



सोमवार, १६ नोव्हेंबर, २००९

सरणार कधी रण




सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी

( कुसुमाग्रज)

कुसुमाग्रजांचे 'विशाखा' मधील एक अप्रतीम काव्य. ऐकायचे, श्वास छातीत गुदमरवत ते डोळ्याची तोरण करुन बघायचे आणी शेवटी हळुच डोळ्याच्या कडा पुसत पावनखिंडीत त्या नरप्रभु समोर नतमस्तक व्हायचे.

स्वामीनिष्ठा शब्द ह्याच नरपुंगवांमुळे जन्माला आला असेल काय हो ? काय ती स्वामीनिष्ठा, काय ते शौर्य ती विरश्री ! बघुनच भलीभली शस्त्रे जागी थंडावली आणी पुढे पडणारी यवनी पावले मागे हटली.

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

प्रभो शिवाजी राजा, अरे हे खडग भुमीवर गळुन पडलय , ह्या निशस्त्र देहाचे शस्त्र बनवुन आता यवनी राक्षसाला मी रोखुन धरलय. प्राण जाण्याची वेळ आता नजीक आलिये प्रभो...

"पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी"

शरणागती ? आणी बाजी प्रभु मागणार ? अहो शक्य तरी आहे का ? शरीराच्या शेवटच्या कणात ताकद असेपर्यंत आणी रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोवर लढायचे ही आमच्या राजांची शिकवण ! आणी हा बाजी शरण जाईलच कसा ?

मग शरणागती कशासाठी ? कुठल्या घरी जायची तयारी ?? अहो शरणागती म्हणजे 'राजा किल्ल्यावर सुखरुप पोचत नाही आणी जोवर तोफांचे आवाज कानी पडत नाहीत तोवर मृत्यु समोरही गुढगे टेकणे नाही. शरणागती नाही. भिती मावळ्यांना, बाजीप्रभुला मृत्युची नाही.. तो तर आमचा सखाच आहे, पण काळजी आहे त्या लाखाच्या पोशींद्याची, त्याच्या गडावर सुखरुप पोचण्याची.



अंबा गावाजवळची, पन्हाळ्याच्या वाटेवरची ती अवखड खींड आणी त्या पावसाळी रात्री खानाच्या सैन्याला अक्षरश: खिंडीत गाठणारे ते 'नरसींह' मावळे आणी त्यांचा नेता बाजीप्रभु. "राजे जोवर तोफांचे आवज होत नाहीत, तोवर एकही यवन ह्या खिंडीला पार करणार नाही" असा शब्द देणारा बाजीप्रभु आणी आपल्या राजसाठी आपल्या दैवतासाठी छातीचा कोट करुन उभे राहिलेले ते अनाम मराठेवीर. अरे मराठेशाहीची दौलत ती हिच ! काय लुटावे लुटणार्‍याने ??

आपल्या रक्ताने ह्या खिंडीला पावन करणार्‍या ह्या मराठी 'दौलतीस' मानाचा मुजरा.


शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९

अदभुत (अंतीम)

कारखानीसांनी दरवाजा उघडला. समर्थांचे नामस्मरण करुन मी आत शिरलो. आत शिरल्या शिरल्याच आपण एखाद्या वेगळ्या जगात प्रवेश केला आहे हे जाणवले. छातीवर कसलेतरी ओझे वाटायला लागले, थोडेसे गुदमरल्या सारखेही वाटत होते. एक विचित्र काहीतरी सडल्यासारखा वास हॉल मध्ये पसरला आणी तयच क्षणी जयराजने हॉल मध्ये प्रवेश केला.

माझी त्याची नजरानजर होताच तो क्षणभर चरकलाच पण मग ह्या वेळेची जणु तो वाटच बघत असल्या सारखा निर्लज्ज हसला. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत रोखुन पाहु लागलो. माझी जयराजच्या आत जे काही होते त्याची ओळख पटवण्यासाठी धडपड सुरु झाली, त्याची सुद्धा भवतेक तीच धडपड चालु असावी. एका सावध क्षणी मला त्याची ओळख पटली, माझा शत्रु मी ओळखला.. तो कालसर्प होता. तोच तो खांडव वनात मारला गेलेला आणी मग पुन्हा पुन्हा या सृष्टीत प्रवेशासाठी आतुर झालेला.

कालसर्प हा खरेतर नागवंशी. इच्छाधारी सर्प आणी असुर कन्या ह्यांच्या मिलनातुन जन्माला आलेला एक घातकी जीव. आईकडुन आसुरी शक्ती आणी बापाकडुन हवे तेंव्हा सर्पात रुपांतर व्हायची शक्ती प्राप्त झालेला कालसर्प म्हणजे एक दुष्ट शक्तींचा एकत्र झालेला समुहच होता.

जस जसा तो मोठा होउ लागला तस तशा त्याच्या विध्वंसक कारवायाही वाढु लागल्या. अशा माणसाची योग्य ती किंमत ओळखुन जरासंधानी त्याला आपल्या गोटात सामील करुन घेतला. मथुरेवर स्वारीच्या वेळी ह्या कालसर्पाचा पुरेपुर उपयोग करुन घ्यायची त्याची इच्छा होती.

पण घडले भलतेच बलरामाकडुन दारुण पराभव पत्करुन कालसर्पाने पलायन केले. जखमी झालेल्या कालसर्पाने एका गुहेचा आश्रय घेतला. काही कालावधी नंतर मांस, मद्य, मैथुनाच्या आहारी गेलेल्या कालसर्पाने ह्या गोष्टींसाठी आजुबाजुच्या वन्य लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी त्याचा उन्मत्तपणा येव्हडा वाढला की वनातुन प्रवास करणार्‍या जमदग्नी ऋषींना अडवुन त्यांच्यावर शस्त्र उगारण्यासही त्याने कमी केले नाही. संतापलेल्या जमदग्नींनी तु कायमचा अंध होउन सर्प रुपातच खांडववनात जाउन पडशील असा त्याला शाप दिला. जमदग्नींच्या शापाने ग्रस्त कालसर्प खांडव वनात जाउन पडला. तिथे त्याने कलीची आराधना सुरु केली. अमरत्व आणी जिवनभर आकंठ मद्य, मास, मैथुनाचा उपभोग हेच त्याचे ध्येय उरले.

अर्जुनाने खांडव वनाचे दहन केल्यावर कालसर्प आपले शरीर मरताना कलीला अर्पुन गेला. त्याच्या भक्तिने प्रसन्न होउन कलीने त्याला त्याच्या मालकीच्या युगात अनेक वरदान व युगाच्या अंतापर्यंत चिरतारुण्य बहाल केले. पण त्याच्या दुर्दैवाने पृथ्वी बिंदुच्या कुठल्याच सींमावरुन त्याला आत प्रवेश मिळत न्हवता. कित्येकदा त्याने आपल्या असुरी , घातकी शक्तीचा वापर करुन आत प्रवेशाचा प्रयत्न केला अथवा प्रवेश केला पण प्रत्येकवेळी तो दंडीत होउन कक्षेबाहेर फेकला गेला होता. शेवटी त्याच्या सारख्या दुरात्म्यांना ह्या जगात प्रवेश करण्यापासुन रोकणे आणी कलीला अजुन ताकद वाढवण्यापासुन थांबवणे हेच तर आमचे जिवितकार्य होते.

"बरे झाले आलास. मी उद्या कोकणात जावे म्हणतोय, येतोस बरोबर??" जयराजनी मला अचानक प्रश्न केला.

"मी आज रात्री कोल्हापुरला निघणार आहे. उद्या संध्याकाळि मी तुला तिथेच गाठतो. खुप महिन्यांच्या गप्पा पुर्‍न करुयात." मी हसत हसत म्हणालो.

जयराजच्या डोळ्यात क्षणभर खुनशी भाव चमकले आणी नाहिसे झाले. आश्चर्यचकीत कारखानीस मला सोडायला खालपर्यंत आले.

"तुम्ही दोघे खरच तिथे भेटणार आहात ?? ह्या सगळ्यात जयराजच्या जीवाला तर काही धोका नाही ना होणार ?" कारखानीसांनी काळजीने विचारले.

"बिलकुल चिंता करु नका, तुमचा जयराज पुर्णपणे बरा होउन लवकरच तुमच्या ताब्यात देतो." मी त्यांना आश्वासीत करत म्हणालो.


आता मला लवकरात लवकर कोकण गाठुन कालसर्पाच्या प्रवेशाचे दार शोधणे आवश्यक होते. ते दार बंद करुन इतर घातक शक्तींना आत येण्यापासुन रोकणे महत्वाचे होते. मी तातडीने रात्रीतच कोकणाकडे प्रयाण केले. पहाटे पहाटे मी जयराजच्या आत्याच्या वाडीत शिरलो. इथेच कुठेतरी आसपास तो प्रवेशबिंदु असणार होता. मी नामस्मरण करत अलख जागवला आणी तिथल्याच एका खडकावर समाधी लावली.

काही वेळातच मला तो प्रवेशबिंदु सापडला. प्रभु रामचंद्रांचा जयजयकार करत मी संरक्षक सुत्राने तो मार्ग बंदीस्त केला. एक काम तर झाले होते, खर्‍या कामाला मात्र आता रात्रीच सुरुवात होणार हे निश्चीत होते. सुर्यवंदना करुन मी आधी समुद्राय यतेच्छ डुंबुन घेतले. पोटातल्या कावळ्यांनी पुन्हा एकदा मला मर्त्य जिवनात ओढुन आणले.

पोटपुजा करुन आधी एक मंदीर शोधुन काढले. प्रभु कृपेने ते श्रीरामचंद्रांचेच मंदीर निघाले. आत भगवान परशुरामांचीही एक सुंदर मुर्ती प्रतिष्ठीत होती. पुजार्‍यांची परवानगी घेउन मी मंदीरातच ध्यान लावले.

अधिकाराचा वापर करण्याआधी जगनियंत्रकाची परवानगी घेणे मला महत्वाचे वाटत होते. माझा रामनामाचा घोष इच्छीत स्थळी पोचला असावा.

"अपरांतक्षा तुझ्या हाकेमागचे कारण मी जाणुन आहे. वत्सा ज्या कार्यासाठी तुला नेमले आहे ते तु पुर्ण करशील ह्याबद्दल शंकाच नाही. जा तुझ्या आज्ञेशीवाय ह्या पृथ्वीकक्षेत प्रवेश करणार्‍या उद्दाम कालसर्पास ठेचुन काढ. यशस्वी भव"

"प्रभु परंतु अनेकदा वेगवेगळ्या मितित भिरकाटुन दिलेला हा कालसर्प पुन्हा पुन्हा प्रयत्न करुन त्या मितितुन सुटका करुन घेत पृथ्वी प्रवेशाचे प्रयत्न करतच असतो. हे कुठवर चालणार प्रभो?"

"अपरांतक्षा अरे मिळालेले ज्ञान विसरलास ? शक्तीचा नाश संभव नाही. तसा प्रयत्नही करु नकोस. निसर्गनियमा विरुद्ध जाण्याचा अधिकार कोणालाच नाही. अगदी मलाही नाही ! जा तुझे नेमुन दिलेले कार्य निसंकोचपणे पुर्ण कर. यशस्वी भव !"

आज कित्येक वर्षांनंतर मी हा पवित्र आवाज ऐकला होता. माझ्या चित्तवृती एकदम प्रफुल्लीत झाल्या होत्या. मंदीरातही एक प्रकारचा पवित्र गंध पसरुन राहिला होता.

"जय शिराम" मी नामघोष केला. ह्यावेळी पुन्हा एकदा माल माझ्या बरोबरीने अनेक आवाज हा घोष करीत असल्याचा अनुभव आला. कानात खडावांचा ध्वनी उमटला आणी मी अत्यंत आदराने हात जोडत डोळे उघडले.

सुर्यदेव अस्ताला निघालेच होते. मी समुद्राकडे म्हणजेच त्या प्रवेश बिंदुकडे प्रयाण केले. तो इथेच भेटणार होता.. कालसर्प. त्यानी इथुन प्रवेश तर मिळवला होता पण ह्या बिंदुच्या विशीष्ठ परिघाबाहेर त्याच्या शक्ती क्षीण होत्या. त्याला संघर्षासाठी इथेच यावे लागणार होते हे मी जाणुन होतो. त्याचवेळी अचानक...

अचानक समोरुन कोणीतरी येताना दिसले. चंद्राच्या प्रकाशात व्यक्ती दुरुन तरी ओळखीची वाटत होती. ते नाना होते, होय नक्कीच. नाना इथे ? ह्यावेळी ? मी हा विचार करत असतानाच मी सरळ सरळ फेकलो गेलो आणी लांब रेतीत जाउन पडलो.

"पृथ्वीच्या रक्षकांचा प्रमुख अपरांतक्ष असा माती खात का पडलाय ?" नाना म्हणाले.

मी हसत हसत कपडे झटकत उभा राहिलो.

"अरे किती बालीश चाळे करशील रे कालसर्पा ?" मी फसीन , घाबरीन वगैरे गैरसमज तर करुन घेतला नाहियेसना ?" मी प्रत्युत्तर देत म्हणालो.

थोड्याशा सावध मुद्रेत असलेला नानांच्या रुपातील कालसर्प आता मुळ रुपात प्रकट झाला.

"ओह्ह ! ओळखलेस तर मला. हरकत नाही, मरण्या आधी कोणाकडुन मरणार आहे हे तर तुला कळले." कालसर्प दहाडला.

"कालसर्पा अजुनही वेळ गेली नाहिये. त्या सर्व शक्तीमान जगनियंत्याला शरण ये. मी तुला शेवटची संधी देत आहे."

"मुर्ख द्वारपाला ! ह्या युगाचा स्वामी माझा मालक 'कली' आहे. प्रचंड शक्तीचा स्वामी ! तुझ्या ह्या वल्गना बंद कर आणी तुच माझ्या स्वामी कलीला शरण ये. सुखात लोळशील." कलसर्प उदगारला.

दुसर्‍याच क्षणी मी प्रभुचे नाव घेत कालसर्पावर प्रहार केला. वादविवादाचा आता उपयोग न्हवता. शासन हाच आता अंतीम उपाय होता.

"बंद कर ह्या पुरातन शक्तीचे प्रदर्शन. असल्या वारांना पुरुन उरीन मी आता." कालसर्पाने दर्पोक्ती केली.

दुसर्‍याच क्षणी माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. कालसर्प मला एका वेगळ्याच मितीत ओढु पाहात होता, ज्याचे संपुर्ण स्वामीत्व त्याच्याकडे होते. तिथला अणु रेणु त्याच्या हुकुमाखाली होता. हे टाळायला हवे होते, त्या मितीत कालसर्प मला निश्चीतच जड गेला असता.

रामनामाचा जप करत मी बंधनपाश फेकुन कालसर्पाला माझ्यासह पुन्हा एकदा माझ्या कक्षेत ओढुन घेतले. संतापलेल्या काल्सर्पाने आता मात्र निर्णायक घावाची तयरी केली असावी. काही क्षण डोळे मिटुन तो काही मंत्राक्षरे पुटपुटला... दुसर्‍याच क्षणी आजुबाजुला काळ्या ढगांची गर्दी दाटली, काही क्षणातच कालसर्पाच्या हातात 'कालदंड' प्रकट झाला.

आता मात्र मी हतबद्ध झालो. कालसर्पाने हा अघोरी दंड कसा आणी कधी प्राप्त केला हेच मला कळेना. यमधर्माकडुन कठोर तपश्चर्या करुन कलीने हा प्राप्त केला होता. आणी आता तो त्याच्या निष्ठावंताच्या हातात होता.

कालदंडाचा पहिलाच प्रहार माझे सुरक्षा कवच भेदुन गेला. मी पुर्णपणे असुरक्षीत झालो... जीवनाची अखेर मला समोर दिसु लागली. खरेतर मृत्युपेक्षाही जास्ती वाईट आपण आपले कार्य पुर्ण करु शकलो नाही ह्याचे वाटत होते. शेवटचा प्रयत्न म्हणुन मी कठोर साधनेच्या वेळी प्रभु रामचंद्राकडुन मिळालेली 'तेजस्वीनी शक्ती' जागृत करायचा प्रयत्न करु लागलो... आणी त्याचवेळी माझ्यावर कालदंडाचा दुसरा आघात झाला.

हा आघात माझी मंत्रशक्ती अर्ध्याने कमी करुन गेला. आता तर मी येव्हडा दुर्बळ झालो की मला शक्तीचे जागरण करणेही अशक्य झाले.

"रामराया धाव रे प्रभु.... " मी मनातल्या मनात आकांत केला. त्याचवेळी तिसर्‍या आणी अंतीम वारासाठी कालदंड माझ्यावर झेपावला.

"जय श्रिराम" मी शेवटचे नाम:स्मरण केले. ह्यावेळी मला पुन्हा एकदा तोच अनुभव आला, माझ्या बरोबरीने अनेक आवाज आसमंतात घुमले. मात्र ह्यावेळची जाणीव अधीक ठळक होती. आणी आश्चर्य म्हणजे माझ्यावर झेपावलेला कालदंड एखाद्या संरक्षक कवचाला धडकल्यासारखा परत गेला होता. मी मान वळवुन मागे बघितले आणी आश्चर्याने पाहातच राहिलो. मागे 'ते उभे होते....

होय 'ते सर्व' आले होते. माझ्या रक्षणासाठी ह्या धरतीच्या रक्षणसाठी. माझे सखे सोबती .. ह्या पृथ्वीच्या प्रत्येक छेदन बिंदुचे रक्षक. त्यात एक नानाही होते.

"वाट कसली पाहतोयस अपरांतक्षा ? दंडीत कर ह्या उद्दाम कालसर्पास. ह्यावेळी त्याला अशी शिक्षा दे की तो पुन्हा असे धाडस करणार नाही." नाना गरजले.

ह्या पवित्र आत्म्यांच्या नुसत्या उपस्थीतीनेच माझे बळ चौपट वाढले होते. मी 'तेजस्वीनी शक्तीचे' आवाहन केले. काही क्षणातच अत्यंत तेजस्वी असे ते शस्त्र माझ्या हातात प्रकट झाले.

" हे अघोरी कालसर्पा, माझ्या परवानगीशिवाय ह्या छेदन बिंदुतुन अघोरी कृत्ये करण्याच्या इराद्याने आता शिरल्याबद्दल मी ह्या बिंदुचा रक्षक अपरांतक्ष तुला दंडीत करत आहे. मी तुला एकाचवेळी सात मितीत कैद करुन तुला काळाच्या मागील स्तरात बंदीवान करत आहे." येव्हडे उदगारुन मी ते पवित्र अस्त्र कालसर्पावर सोडले. काही क्षण सगळीकडे एक लखलखाट झाला, ते शस्त्र आणी दंडीत कालयवन दोघेही नाहिसे झाले.

प्रभुच्या अस्त्राने आपले कार्य चोख बजावले होते.


(समाप्त)

(ह्या भागात मी दिलेले जरासंध, जमदग्नी, यम इत्यादींचे सर्व संदर्भ हे काल्पनीक असुन ते फक्त कथेची रोचकता वाढवायला वापरले आहेत.)

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या".

कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'.


ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ? सात बार्‍यावरच्या कर्जाच्या नोंदी, सर्कारी बियाणे वाटपाची खरी परिस्थीती, शेतकर्‍यासाठी म्हणुन मिळणारे कर्ज आणी ते मिळवताना येणार्‍या अडचणी, संबंधीत लोकांनी केलेली अडवणुक सगळे अगदी काळजाला हात घालणारे.


शेतकर्‍याच्या प्रश्नाला वाचा फोडणारे म्हणुन बरेच चित्रपट येउन गेले आणी येतील, पण बळीराजाच्या खर्‍या प्रश्नांची आपल्यासमोर मांडणी करणारा चित्रपट म्हणुन 'गोष्ट छोटी डोंगरा एवढीची' दखल निश्चीतच घ्यावी लागेल.

कथेची उत्कृष्ट मांडणी आणी त्याला कलाकारांच्या अभिनयाची तेव्हडीच मिळालेली अप्रतिम साथ हे ह्या चित्रपटाचे वैशीष्ठ्य म्हणता येईल. भरत जाधव आणी मकरंद अनासपुरेचा चित्रपट म्हणले की आजकाल पळुनच जावेसे वाटत होते, अशावेळी मकरंद अनासपुरेचा ह्या चित्रपटातील संयत अनुभव अत्यंत सुखावुन जातो. मकरंदनी नेहमीप्रमाणेच अतिशय समजुन उमजुन हि भुमीका केली आहे. कारकिर्दीत त्याला मिळालेली एक आव्हानात्मक भुमीका असा हिचा उल्लेख करायला हरकत नाही.


नागेश भोसले हा असाच अजुन एक ताकदीचा अभिनेता. देहबोली आणी आवाजाचा पुरेपुर फायदा कसा उठवावा हे ह्या अभिनेत्याकडुन शिकुन घ्यावे. ह्या चित्रपटात त्यानी मकरंदच्या गरीब शेतकरी मित्राची भुमीका साकारली आहे. कुटुंबासाठी धडपडणारा, पैशाची कायमच अडचण असतानाही शहरातुन आपला मित्र मकरंद आलेला बघुन त्याच्यासाठी श्रिखंड आणणारा, कर्जाच्या डोंगराखाली बैल विकावा लागल्यावर स्वत:ला नांगराला जुंपणारा नागेश भोसले काळजात घर करुन जातो.


शेवटी हालाखीच्या परिस्थीतीमुळे आणी कर्जाच्या डोंगराखाली हा नागेश भोसले किटकनाशक पिउन आत्महत्या करतो तो प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा. रात्री उशीरा अडखळत परत आला म्हणुन बायकोची आणी मित्राची बोलणी खाताखाता, "दारु पिउन आला का?" विचारल्यावार नागेश भोसले म्हणतो "दारु नाही, किटकनाशक प्यायलोय..." बास, संपुर्ण थेटरच आपल्या डोळ्याभोवती गरकन फिरल्यासारखे वाटते.


शेतकर्‍याला कर्जासाठी, सरकारकडुन होणार्‍या बियाणे पुरवण्यासाठी वेळोवेळी कसे नाडले जाते, प्रत्येक ठिकाणी टेबलाखालच्या पैशासाठी कशी अडवणुक होते, पावसाचा लहरीपणा, २२/२२ तास गायब असणारी विज ह्या सगळ्याचे विदारक चित्र दिग्दर्शकाने साकारले आहे. चिकुच्या मिळालेल्या ५/- रुपायाच्या सरकारी चेकसाठी ५००/- पेक्षा जास्त पैसे भरुन बॅंकेत शेतकर्‍याला खाते उघडावे लागते हि माहिती ऐकुन तर डोक्याला हात लावायची पाळी येते.

शेवटी जेंव्हा मकरंद अनासपुरे "एक माणुस म्हणून तरी शेतकर्‍याचे अस्तीत्व मान्य करा" असे कळवळुन म्हणतोना तेंव्हा कुठेतरी आपल्याला आपणच गुन्हेगार असल्यासारखे वाटायला लागते.

मकरंद अनासपुरे, कै. निळुभाउ फुले, नागेश भोसले, सयाजी शिंदे, माधवी जुवेकर, मधु कांबीकर अशा उत्तमोत्तम ताकदीच्या कलाकारांचा सुंदर अभिनय ह्या चित्रपटाची जमेची बाजु आहे. चित्रपटात अधुन मधुन वाजणारे शिर्षक गीत मात्र डोक्यात जाते येव्हडाच काय तो चंद्रावर डाग म्हणायचा. आधी हा उपदव्याप अजय - अतुल ह्या संगितकारांचा(?) असावा असे वाटत होते पण नंतर तो शैलेंद्र बर्वे ह्या संगीतकाराचा आहे असे जालावर शोध घेता कळाले.

एकुणच बळीराजाचे खरे वास्तव जाणुन घेण्यासाठी हा चित्रपट निश्चीतच पहा.