सोमवार, २६ डिसेंबर, २०११

मगधीरा



काजल अगरवाल हिच्यावरती आजकाल आमचा भारी जीव. तिच्यावरती चित्रित केलेले मगधीरा मधील ' धीर धीर..' हे आमचे अत्यंत आवडते असे गाणे. ह्या मगधीरा चित्रपटाबद्दल खूप ऐकले होते, खरेतर हा एकदा पाहिला देखील होता. मात्र सबटायटल्स नसल्याने शष्प काही कळले नव्हते. चार दिवसांपूर्वी सबटायटल्स सकट ह्या चित्रपटाची प्रिंट मिळाली आणि दिल एकदम गार्डन गार्डन झाले. ह्या एका नितांत सुंदर चित्रपटाची ही ओळख.



मगधीरा म्हणजे शूर, धैर्यवान. हा चित्रपट फ्लॅशबॅक आणि वर्तमान अशा दोन्ही काळात वावरणारा असला तरी दोन्ही काळांचा सुंदर संगम साधलेला असल्याने इतर फ्लॅशबॅक चित्रपटांसारखा कंटाळवाणा होत नाही. चित्रपटाची कथा सुरू होते ४०० वर्षापूर्वीच्या काळापासून. चित्रपटाच्या सुरुवातीलाच कड्यांवरून पडून जखमी काजल अगरवाल मृत्युमुखी पडताना दिसते, मृत्यूपूर्वी तिने कोणा भैरवाकडे (राम चरण तेजा) प्रेमाची मागितलेली कबुली आणि तिच्या मागोमाग त्याने देखील मारलेली उडी अशा दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. ह्या दोघांच्या मृत्यूनंतर त्याच कड्यांवरती शेरखान (श्री हरी रघुमुंद्री) भैरव परत जन्म घेणार आणि आपले ह्या जन्मात अपुरे राहिलेले प्रेम प्राप्त करणार अशी गर्जना करताना दिसतो आणि आपल्याला पुढचा अंदाज यायला लागतो.

आता एकदम वर्तमानाकडे चित्रपट वळतो. पूर्वजन्मीचा भैरव आता हर्षा म्हणून जन्माला आलेला असतो. बाइक रेसींग, स्टंट हे त्याच्या उपजीविकेचे साधन. तर पूर्वीची युवराज्ञी मित्रविंदा अर्थात काजल अगरवालने इंदू म्हणून जन्म घेतलेला आहे. एका पावसाळी दिवशी रिक्षाने जात असताना हर्षाचा स्पर्श इंदूच्या हाताला होतो आणि त्याला गतजन्मीच्या काही गोष्टी दिसतात. ह्या धक्क्याने हादरलेला हर्षा आता इंदूचा शोध घ्यायला रिक्षा सोडून धावतो. काजल अगरवाल त्याच्या शोधामागचे नक्की सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्याला आपण इंदूची मैत्रीण असल्याचे खोटेच सांगते आणि त्यांची गाठ घालून देण्याचे वचन देते. इकडे चालबाज हर्षा देखील आपण इंदूला ओळखतो, तिचे आणि आपले प्रेम आहे मात्र तिचा बाप ह्याच्या विरुद्ध आहे असे खोटेच सांगतो. आता सुरू होतो तो इंदूला भेटवण्याचा आणि दर वेळी तो फसण्याचा खेळ.



इंदूचे वडील इकडे आपल्या पूर्वजांच्या उदयगढ ह्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयीन लढा देत असतात, ज्यावर त्यांच्या मेव्हण्याने कब्जा केलेला असतो. ह्या मेव्हण्याचा मुलगा रघुवीर (देव गील) इंदूला पाहताच तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्या प्राप्तीसाठी वेळेला स्वतःचा वडलांचा देखील खून करायला मागे पुढे पाहतं नाही. आता इंदू आणि प्रॉपर्टी दोन्ही मिळवायचा तो निश्चय करतो. त्याचा गुरु घोरा मात्र त्याला सावध करतो, की जोवर हर्षा जिवंत आहे तोवर तो इंदूला कधीच मिळवू शकणार नाही. त्यानंतर घोरा त्याला त्याच्या पूर्वजन्मीची हकिगत सांगतो. इकडे इंदू मात्र हर्षाच्या प्रेमात बुडलेली असते. आता तो इंदू आणि तिच्या वडलांची क्षमा मागून त्यांना आपल्याकडे घेऊन येतो. हर्षाच्या प्रेमात बुडलेल्या इंदूच्या प्रेमाला आधी तिचे वडील विरोध करतात, मात्र नंतर त्याला मान्यता देण्याचा निश्चय करतात. त्यांचा हा बदलता निर्णय पाहून रघुवीर त्यांचा खून करतो आणि आळ हर्षावरती आणतो. परिस्थिती देखील अशी येते की हर्षाच खुनी असल्याचा इंदूचा ठाम विश्वास बसतो.
रघुवीर आता इंदूला आपल्याबरोबर उदयगढला नेण्याचा निर्णय घेतो, त्याचवेळी हर्षा आपले निर्दोषत्व सांगायला तिथे पोचतो. बर्‍याच हाणामारीनंतर हेलीक्रॉप्टरला लटकलेल्या हर्षाला इंदूचा पुन्हा स्पर्श होतो आणि एक झटका बसून तो थेट खाली तळ्यात कोसळतो.



आता ह्यावेळी आपला संपूर्ण पुनर्जन्म त्याला आठवतो. आता चित्रपट थेट ४०० वर्षे मागे १६०० सालात जाऊन पोचतो. उदयगढ च्या राज्याची मित्रविंदा (वर्तमानातली इंदू) ही एकुलती एक कन्या. तिचा भावी पती म्हणून रणदेव भिल्ल (अर्थात वर्तमानातला रघुवीर) कडे पाहिले जात असते. मित्रविंदा मात्र मनातल्या मनात भैरव (वर्तमानातील हर्षा) वरती प्रेम करत असते. ह्या भैरवाच्या अनेक पिढ्यांनी उदयगढ साठी आपले प्राण त्यागलेले असतात. त्याच्या वंशातील योद्ध्यांना एक शाप असतो, १०० शत्रू मारल्याशिवाय ते रणांगणात देह ठेवणार नाहीत आणि ३० वर्षाच्या वरती कोणी जगणार नाही.
मित्रविंदाच्या प्राप्तीसाठी ठेवलेल्या पणात रणदेव भिल्ल आणि भैरव दोघेही भाग घेतात. रणदेवाच्या वर्तणुकीने आधीच चिडलेली मित्रविंदा ह्या पणात जो हरेल त्याला बहिष्कृत करून राज्याबाहेर काढले जाईल असेही सुनावते. राज्याच्या आणि मित्रविंदेच्या लालसेने पछाडलेला रणदेव अनेक कॢप्त्या करतो मात्र शेवटी भैरवच जिंकतो. अर्थातच रणदेवाला राज्याबाहेर हाकलले जाते. भैरवच्या वंशाला असलेल्या शापाची माहिती असल्याने राजा भैरवला मित्रविंदाच्या प्राप्तीचा ध्यास सोडण्याची आणि प्रेमाचे त्याग करण्याची विनंती करतो, जी जड मनाने भैरव स्वीकारतो. मित्रविंदा मात्र कोसळून पडते.

इकडे राज्यावरती शेरखान ह्या हिंदुस्थान प्राप्तीच्या ध्येयाने पछाडलेल्या योद्ध्याचे सावट आदळते. त्यातच अपमानित झालेला रणदेव भिल्ल शेरखानशी हात मिळवतो आणि राजाचा खून करून राज्य ताब्यात घेतो. शंकराच्या पूजेसाठी गेलेले मित्रविंदा आणि भैरव मात्र बचावतात. आता शेरखानच्या फौजेसह रणदेव त्यांच्यावरती चाल करून जातो. भैरवाच्या शौर्याचे किस्से ऐकलेला शेरखान त्याला आव्हान देतो आणि १०० सैनिकांची तुकडी त्याच्या एकट्यावरती हल्ला करायला पाठवतो. भैरव त्या सर्व सैनिकांना कंठस्नान घालतो. त्याच्या पराक्रमाने स्तब्ध झालेला शेरखानदेखील त्याच्यापुढे आदराने झुकतो. रणदेव मात्र ह्यासर्वाला तयार नसतो. शेवटी त्याचा व भैरवच्या अंतिम युद्धात भैरव त्याला ठार मारतो, मात्र मरता मरता रणदेव मित्रविंदाला चाकूने प्राणघातक जखम करूनच प्राण सोडतो.



चित्रपट पुन्हा वर्तमानकाळाकडे वळतो. पाण्यात बुडलेल्या हर्षाला आता पूर्वजन्मीचा शेरखान आणि ह्या जन्मीचा सोलोमन हा कोळी वाचवतो. त्याच्या मदतीनेच आता इंदू अर्थात मित्रविंदाला मिळवण्यासाठी हर्षा सज्ज होतो. मग जे काय टिपिकल साऊथ स्टाइल घडत जाते ते पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे.



कुठेही उगाच भावनांना हात घालण्याचा न केलेला प्रयत्न, अप्रतिम संगीत, भव्य आणि अप्रतिम सेट्स, सुंदर लोकेशन्स, झकास गाणी आणि कोरीओग्राफी, प्रत्येक फ्रेम मध्ये दिग्दर्शकाबरोबरच जाणवणारे कॅमेरामनचे टीम वर्क, आणि त्याला लाभलेली सर्वच कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाची साथ ह्या सगळ्याचा जुळून आलेला योग म्हणजे मगधीरा. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने अनेक अ‍ॅवॉर्डस मिळवले. लक्ष्मी आणि सरस्वती अशा दोघींचा वरदहस्त ह्या चित्रपटाला लाभला. लवकरच ह्या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील येणार असल्याची चर्चा आहे.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

शटर

1

मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' ची ओळख ह्या आधी करून दिलीच आहे. ह्याच यादीतला आणखी एक चित्रपट म्हणजे 'शटर'. 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' हे काहीसे गडद गडद अंधारात घडणारे , मानसिक आंदोलने दाखवणारे चित्रपट होते, मात्र शटर ह्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सतत तुमच्या मनावर एक दडपण ठेवून असणारा चित्रपट. ह्या चित्रपटात देखील रक्तपात, हिडीस चेहरे ह्याचा समावेश नाही, मात्र चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम आपल्याला खिळवून ठेवते.



टन हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर असतो. तो आणि त्याची गर्लफ्रेंड जेन एकदा पार्टीवरून परत येत असताना, जेनच्या हातून एक अपघात घडतो. ती आपल्या गाडीने एका तरुण मुलीला उडवते. गाडीबाहेर जाऊन तिला मदत करण्याच्या विचारात असलेल्या जेनला टन थांबवतो आणि त्या तरुणीला तसेच रस्त्यात सोडून दोघे निघून जातात. इथून खर्‍या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.

2

ह्या प्रसंगानंतर एकाएकी अनेक चमत्कारिक घटना घडू लागतात. सतत आपल्या भोवती कोणीतरी वावरत आहे असे दोघांना वाटत असते. त्यातच टनने काढलेल्या प्रत्येक फोटो मध्ये एक धुरकट आकृती दिसायला लागते. कधी धुरकट सावलीच्या रूपात, तर कधी चेहर्‍याचा रूपात. प्रथमतः टनला हा कॅमेर्‍याचा प्रॉब्लेम वाटतो, मात्र तसे काहीच निष्पन्न होत नाही. इकडे जेन मात्र आपण ज्या मुलीला उडवले त्या मुलीचा आत्माच हे सगळे करत आहे ह्या निष्कर्षावर पोहोचते. टनला मात्र हे सगळे अमान्य असते.

3

टनच्या मित्रांना देखील आता विचित्र अनुभव यायला लागतात. टनला देखील अचानक मानदुखीचा त्रास सुरू झालेला असतो, त्याचे वजनकाटा देखील त्याचे वजन विचित्र दाखवायला लागलेला असतो. शेवटी जेन त्या अपघातग्रस्त तरुणीचा शोध सुरू करते. तपासात जेनला त्या मुलीचे नाव नात्रे असल्याचे आणि ती आणि टन व त्याच्या मित्रांचा ग्रुप कधीकाळी एकाच कॉलेजात शिकत असल्याचे समोर येते. आता मात्र टनला सत्य सांगण्याशिवाय पर्याय उरत नाही. कधी काळी त्याचे आणि नात्रेचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नाते तोडल्यावर ते दु:ख सहन न होऊन नात्रेने आत्महत्या केल्याचे टन कबूल करतो. इकडे टनचा एक मित्र नात्रेच्या आत्म्याच्या भितीने आत्महत्या करतो. आता पुढचा नंबर आपलाच असल्याची त्याची खात्री पटते.

ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायच्या इराद्यानेच आता जेन आणि टन दोघेही नात्रेच्या आईला जाऊन भेटता. तिथे गेल्यावर नात्रेने कशी आत्महत्या केली हे त्यांना कळते, मात्र नात्रेची आई तिचा मृत्यू मान्य करायलाच तयार नसते. तिने आपल्या मुलीचे प्रेत अर्थात सांगाडा तिच्या बेडरूम मध्ये जतन करून ठेवलेला असतो. त्याच रात्री हॉटेलात उतरलेल्या टन आणी जेनवरती नत्रेचा आत्मा हल्ला करतो, ज्यात टन जखमी होतो. अथक प्रयत्नांनी दोघेही तिच्या आईला समजवतात आणि शेवटी नात्रेची विधिपूर्वक विल्हेवाट लावली जाते.

4

आता सर्व काही सुरळीत होईल ह्या आशेनं परतलेल्या जेनला काही फोटो मिळतात, जे नात्रेचे टनच्या फ्लॅट मधील अस्तित्व दाखवत असतात. फोटोंचा माग घेत असतानाच एका जेनच्या हातात एका बुकशेल्फ मध्ये लपवलेल्या काही जुन्या निगेटिव्ह्ज लागतात. त्या डेव्हलप केल्यानंतर एक भयानक रहस्यच जेनच्या समोर येते आणि चित्रपटाला वेगळेच वळण लागते. हे रहस्य काय असते ? टन आणि त्याच्या मित्रांच्या जीवावर नात्रेचा आत्मा का उठलेला असतो ? हे सगळे शोधायचे तर शटर पाहण्याशिवाय पर्याय नाही. आणि हो हे सर्व सोडाच पण 'टनला नक्की मानदुखीचा त्रास कशाने होत असतो' ह्या एकमेव प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तरी शटर पाहाच पहा.

5

शटरचा त्याच नावाने २००८ साली अमेरिकन रीमेक देखील आलेला आहे, तर हिंदीत तो क्लिक नावाने आला होता. मी तरी तुम्हाला 'ओरिगिनल' शटरच बघण्याचा सल्ला देईन. अर्थात जालावर त्याचे सबटायटल्स सहजपणे उपलब्ध आहेतच. एका वेगळ्या प्रकारचा हॉरर चित्रपट बघायची इच्छा असेल आणि मिनिटा मिनिटाला नवनवे धक्के बसणे आवडत असेल तर शटरला पर्याय नाही.

हा संपूर्ण चित्रपट आंतरजालावर फुकट उपलब्ध आहे.

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

!! मोरया !!



बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या. किरकोळ बदल सोडता अवधूत गुप्ते ह्यांनी झेंडाचीच टीम इथे उतरवलेली आहे.

कथा-पटकथा-संवाद अशी तिहेरी जबाबदारी सचिन दरेकर ह्यांनी सांभाळलेली असून, अतुल कांबळे आणि अवधूत गुप्ते ह्यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. दिग्दर्शन म्हणून पुन्हा एकदा अवधूत गुप्तेच आहेत. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, परी तेलंग, संतोष जुवेकर, मेघना एरंडे, धनश्री कोरेगावकर अशी तरुण आणि अभिनयसंपन्न स्टारकास्ट आहे. अर्थात ह्यातील परी तेलंग व मेघना एरंडे ह्यांच्या भूमिका प्रमुख भूमिका म्हणून का गणल्या गेल्या आहेत हा मोठा प्रश्नच आहे.


गणेशोत्सव, त्याचे पावित्र्य, गणेशाच्या उत्सवात शिरकाव करून बसलेल्या वाईट प्रथा, गणेशोत्सवाच्या आधारे चालवले जाणारे राजकारण आणि एकूण राजकारण्यांची प्रवृत्ती अशा सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न म्हणजे 'मोरया' हा चित्रपट. कथेच्या जोडीला चाळीचे बिल्डिंगमध्ये रुपांतर, दोन चाळींमधला आपलाच गणपती कसा मोठा ह्यासाठी होणारा संघर्ष, तरुणाईची सध्याची तगमग असल्या पटकथांची देखील जोड आहे. मुळात कथाच दमदार नसल्याने ह्या पटकथा देखील तिला टेकू देऊ शकलेल्या नाहीत. ना भरभक्कम कथा, ना पटकथा, त्यातच संवादात देखेल फारसा दम नसल्याने अनेक गुणी कलाकार असूनही हा मोरया काही सुखकर्ता ठरत नाही.

समोरासमोर परंतु एकाच जागेत असलेल्या गणेश चाळ व खटाव चाळ ह्या दोन चाळी. दोन्ही चाळींचे गणपती वेगळे, इतर सणवारही वेगवेगळे साजरे होणारे. लवकरच तिथे विकसन होणार असल्याने, बिल्डरने एकाच गणपतीसाठी मंदिराची सोय करण्याचे कबूल केले आहे. आता एकाच गणपतीची स्थापना ह्यापुढे दरवर्षी करायचे चाळकरी ठरवतात. दोन्ही चाळीतल्या तरुणांना मात्र हे मान्य नाही. एका चाळीच्या तरुणांचा नेता आहे चिन्मय मांडलेकर तर दुसर्‍या चाळीचा अर्थातच संतोष जुवेकर. ह्या दोन्ही चाळीतला शहाणा मनुष्य म्हणजे दिलीप प्रभावळकर. अर्थात दोन्ही गट त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. शेवटी ह्या वर्षी ज्या गटाचा गणपती जास्ती गर्दी खेचेल, जास्ती प्रसिद्धी मिळवेल तो टिकेल असा ठराव होतो आणि दोन्ही गट जीव तोडून मेहनतीला लागतात.




आता आपलाच गणपती टिकला पाहिजे ह्या ईर्ष्येने दोन्ही गट पेटून उठल्याने मग मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोला करण्याची चढाओढ सुरू होते. वेळेप्रसंगी मग त्यासाठी एका गटाकडून राजकारण्यांचा आसरा घेतला जातो तर एका गटाकडून चक्क मुसलमान मालक असलेल्या यात्रा कंपनीचे पोस्टर मांडवाबाहेर झळकवले जाते. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नाही नाही त्या मार्गांचे अवलंब करायला दोन्ही गट सुरुवात करतात. मग आपला गणपती नवसाला पावतो अशी संतोष जुवेकरच्या गटाने चॅनेलवरती खोटी जाहीरात करताच, चिन्मय मांडलेकरच्या गटाकडून त्यांनी लावलेले मुसलमानी पोस्टर आणि त्यांचा गणेशोत्सव कसा सर्वधर्म समभाव निर्माण करणारा आहे ह्याची जाहिरातबाजी केली जाते. त्याच वेळी चिन्मय मांडलेकर हा खरा मुसलमान, मात्र सच्चा गणेशभक्त असल्याचे दाखवून अवधूत गुप्ते आपल्याला छान चक्कर आणतो. डोक्याला हात मारून पुढे काय घडते ते बघण्याशिवाय आपल्या हातात काही नसते.



मग उरलेल्या काळात बाप्पासाठी कार्यकर्ते कशी जीवतोड मेहनत घेतात, संतोष जुवेकर सारखे तडफदार [?] तरुण रजा मिळाली नाही तर नोकरी वरती लाथ कशी मारतात, दहा दिवस कार्यकर्ते बाप्पासाठी दारूचा त्याग कसा करतात इ. इ. आपण नेहमी वाचत असलेले आणि बघत असलेले प्रसंगच साकार होतात. त्यामुळे मधल्या वेळात थोडीशी डुलकी घेतली तरी चालेल.

हान तरा आता सरळ मार्गाने पुरेसे यश काही मिळत नाही म्हणल्यावरती दोन्ही गटाकडून गैरमार्गाचा वापर केला जातो. अर्थात त्याला पाठिंबा असतो तो राजकारण्यांचाच. एका गटाकडून दुसर्‍या गटाच्या मांडवामागे दारूच्या बाटल्यांचा ढीग ठेवला जातो आणि त्याचे चित्रीकरण करून चॅनेलवरती दाखवले जाते. अर्थात मग दुसर्‍या गटाकडून विरुद्ध गटाच्या मांडवाबाहेर लावलेल्या हिरव्या पोस्टरचे नुकसान केले जाते. ही घटना घडते आणि ताबडतोब शहरात दंगली उसळतात. मग दोन्ही धर्माचे राजकारणी त्याचा येणार्‍या निवडणूकीत कसा वापर करता येईल त्याच्या हिकमती लढवायला लागतात. शेवटी काय होते ? खरा गुन्हेगार सापडतो ? दोन्ही गटांना आपली चूक लक्षात येते ? आणि शेवटी गणपती कुठल्या गटाचा राहतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर 'मोरया' दर्शाना शिवाय पर्याय नाही. अर्थात आजकालच्या तुम्हा जाणकार मंडळींना असे प्रश्न पडतील असे वाटत नाही. ह्याची उत्तरे चित्रपट न बघताच तुम्हाला कळले देखील असतील.



बरं आता चित्रपटाचे येवढे पोस्टमार्टेम केल्यावर, चित्रपटात काही चांगले आढळलेच नाही का ? नक्की आढळले. स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर ह्या तरुणांचा अभिनय, त्यांचे लुक्स, त्यांची संवादफेक, कॅमेर्‍याचे ज्ञान सगळे सगळे आवडले. चित्रपटाचे चित्रीकरण, वापरलेले लोकेशन्स देखील झकास. शीर्षक गीत, दहीहंडी नृत्य देखील झकास जमले आहे. मात्र दिलीप प्रभावळकर ह्यांना अशी आगा पिच्छा नसलेली आणि जणूकाही समोपदेशकाच्या थाटाची भूमिका देऊन वाया का घालवले आहे ते कळत नाही. परी तेलंग, मेघना एरंडे ह्या देखील चॅनेल्सच्या निवेदकांच्या भूमिकेत छाप पाडू शकलेल्या नाहीत. अर्थात भूमिका मध्येच काही दम नसल्याने त्यांना दोष का द्यावा ? मुळात ह्या दोन चाळीतल्या गणेशोत्सवा शिवाय जगात काही घडतच नाहीये अशा ठाम मानसिकतेने ही चॅनेल्स चाळीतच ठाण मांडून का बसलेली असतात ते बाप्पालाच ठाऊक.



राकारण्याच्या भूमिकेत इथे पुन्हा एकदा ३/४ प्रसंगात पुष्कर श्रोत्री दर्शन देतो. त्याची भूमिकाच उद्धव ठाकरे टाईप लिहिली आहे, का तो अजून झेंडाच्या मानसिकतेतून बाहेरच पडू शकलेला नाही ते कळत नाही. चित्रपटात मध्येच एक मुसलमान नेता कम बिझनेसमनचे पात्र घुसडलेले आहे. कुठल्याच पात्राला एक ठाम अशी विचारधारा किंवा ज्याला ग्राउंड म्हणावे ते पुरवले गेलेले नाही. कुठलेच पात्र ठसठशीत झालेले नाही. स्पृहा जोशी फक्त गायला मिळते, गळ्याचा कस वगैरे लागतो म्हणून डान्सबार मध्ये गात असते हे तर पटता पटत नाही. चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर हे पोटापाण्यासाठी, रोज रात्री दारू पिण्यासाठी पैसे कुठून आणतात हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या बुद्धिसामर्थ्यावर सोडवावा.
एकुणात काय तर एकाच चित्रपटात सगळेच काही दाखवण्याचा अवधूत गुप्तेंचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११

Acacia (कोरिअन चित्रपट)



हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष.



डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य. आपल्या वडिलांच्या मदतीने शेवटी एकदा डॉक्टर किम आपल्या पत्नीला मूल दत्तक घेण्यासाठी राजी करतो आणि ह्या चित्रपटाला सुरुवात होते. कलेची आवड असणारी मी-सूक जिन्साँग ह्या सतत चित्रे काढण्याची आवड असणार्‍या अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेते. जिन्साँगच्या घरी येण्याने ह्या कुटुंबाच्या एका नव्याच आयुष्याला सुरुवात होते.



अतिशय अबोल आणि सतत झाडांचीच चित्रे काढण्यात मग्न असणारा जिन्सॉंग आपल्या सभोवताली कायमच एक गूढ वलय बाळगून असतो. काही दिवसातच जिन्साँग समोरच्या घरात राहणार्‍या मिन्जी ह्या लहान मुलीकडे आणि त्याच्या घराच्या बागेत असलेल्या एका वठलेल्या अ‍ॅकेशिआ वृक्षाकडे आकर्षित होतो. ते झाड म्हणजे आपली मेलेली आई असल्याचे जिन्सॉंगचे ठाम मत असते. मिन्जीच्या संगतीत काहीसा अबोल असणारा जिन्साँग थोडाफार बोलका तर बनतोच पण काहीसा दुराग्रही आणि हट्टी देखील बनायला लागतो. त्यातच मी-सूक ला दिवस जातात आणि सगळे चित्रच बदलते.



आपली आई आता नव्या बाळाची आई होणार ह्या कल्पनेने आधीच हट्टी असलेला जिन्साँग फारच दुराग्रही बनून जातो. त्यातच मुलीच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून हजर झालेली मी-सूक ची आई तिला जिन्साँगला परत अनाथाश्रमात पाठवायचा सल्ला देते. मी-सूक मात्र त्याला तयार होत नाही. बाळाच्या जन्मानंतर मात्र जिन्साँगचे वागणे एकदमच खुनशी होऊन जाते आणि सगळे कुटुंबच दचकते. जिन्साँगला सतत समजून घेण्याचा प्रयत्न करणारी मी-सूक देखील आता त्याच्याशी प्रेमाने वागेनाशी होते. अशा काजळलेल्या वातावरणात एका पावसाळी रात्री जिन्साँग अचानक नाहीसा होतो आणि संपूर्ण कथेला एक वेगळेच वळण लागते.



जिन्साँगच्या जाण्याने एकटी पटलेली छोटी मिन्जी आता सतत आपला वेळ त्या वठलेल्या अकॅशिआ वृक्षाच्या सानिध्यातच घालवायला लागते. त्या झाडातून जिन्साँग तिच्याशी बोलतो असे ती सांगायला लागते आणि सगळे दचकतात. त्यातच अचानक जिन्साँग नाहीसा झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून त्या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटायला सुरुवात होते. काही दिवसातच तो वृक्ष चांगलाच बहरतो आणि एकेदिवशी त्या वृक्षाकडून त्याच्या परिघात येणार्‍या जिन्साँगच्या दत्तक कुटुंबावर फांद्या आणि मुंग्यांच्या साहाय्याने जीवघेणे हल्ले सुरू होतात. ह्या अचानक घडू लागलेल्या अनैसर्गिक घटनांनी संपूर्ण कुटुंबच थरारून उठते. आणि मग एक दिवशी अचानक सगळ्या रहस्यावरचा पडदा उघडतो आणि आपण प्रेक्षक सुन्न होऊन जातो.



जिन्साँगच्या बाबतीत नेमके काय घडलेले असते ? तो परत येतो ? अ‍कॅशिआ आणि जिन्साँगचे नक्की नाते काय असते ? मिन्जी जे सांगत असते ते खरे असते का ? ह्या अशा रहस्यमयी प्रश्नांनी सोडवणूक आणि तो सुटतानाचा थरार पडद्यावर बघण्यातच खरी मजा आहे. चित्रपट कोरिअन असला तरी इंग्रजी सबटायटल्स सकट तो उपलब्ध असल्याने निराशा होण्याचे कारण नाही. कुठेही रक्तपात, माणसे कापाकापीची दृश्ये, ओंगळावाणी भुते, विचित्र आणि कर्कश संगीत ह्याची जोड न घेता देखील तुम्हाला रहस्यमयी वातावरणात कसे खिळवून ठेवले जाते ह्याचा अनुभव घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. अनेक दृश्यात संवाद कमी आणि कॅमेर्‍याचा वापर जास्ती करून दिग्दर्शक आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो. दिग्दर्शन, कथा आणि अभिनय सर्वच अंगाने सुरेख असलेला हा चित्रपट पाहायलाच हवा.

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११





सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

Fast Five



आज सकाळी नेहमीप्रमाणेच मोकळा असल्याने शनिवारी अर्धवट राहिलेला Fast Five हा चित्रपट पाहून संपवला. The Fast and the Furious सिरीज मधला हा पाचवा चित्रपट. पहिल्या दोन भागांनंतर बाहेर गेलेले विन डिझेल आणि पॉल वॉकर ह्या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, आणि त्यांना साथ मिळाली आहे WWF स्टार 'द रॉक' ची. येवढी तगडी स्टारकास्ट आणि जोडीला The Fast and the Furious ची भन्नाट कार ड्रायव्हिंग, जबरदस्त संवाद आणि तोंडावर कमी आणि बंदुकांवर जास्त विश्वास ठेवणारे खलनायक अशी सर्व वैशिष्ट्ये घेऊन हा चित्रपट हजर झाला आहे.

विन डीजलला (डॉमनिक) पूर्वाश्रमीच्या गुन्ह्यांसाठी २५ वर्षाची शिक्षा दिली जाते, अर्थात शिक्षेमध्ये पॅरोलची संभावना देखील नसतेच. कायद्याचा रक्षक डॉमचा मित्र आणि डॉमच्या बहिणीचा मियाचा प्रियकर पॉल वॉकर ( ब्रायन ओ कॉनर) आता आपली बाजू बदलून डॉमला वाचवायचे ठरवतो आणि इथे चित्रपटाला सुरुवात होते. अर्थात नेहमीप्रमाणेच अचाट कार ड्रायव्हिंग स्किल्स आणि अचूक टायमिंगच्या जोरावर ब्रायन आणि मिया मिळून डॉमला आणि इतर कैद्यांना घेऊन जाणारी बस उलटवण्यात यशस्वी होतात आणि डॉम पळून जाण्यात.



आता तिघांचे लक्ष असते ते रिओ गाठणे. डॉमनिकची वाट बघत ब्रायन व मिया तात्पुरते त्यांच्या जुन्या मित्राच्या विन्सी च्या आश्रयाला येतात. इथेच मियाला आपण आई होणार असल्याचे कळते. डॉमच्या आगमनाच्या मधल्या काळात विन्सीकडे नेहमीप्रमाणे एक जॉब चालून येतो आणि ब्रायन आणि मिया त्याला जॉईन होतात. जॉब असतो नेहमीप्रमाणेच चोरीचा. ह्यावेळी धावत्या ट्रेनमधून काही कार्स पळवण्याचा जॉब आलेला असतो. जॉब पूर्ण करत असतानाच ज्या गाड्यांच्या चोरीचा हा जॉब आहे त्या गाड्या 'सिझ' केलेल्या आहेत आणि गाड्यांबरोबरच फेडरल एजंटस देखील ट्रेनमध्ये असल्याचे मिया आणि ब्रायनच्या लक्षात येते. त्याचवेळी इतर ग्रुप बरोबर डॉम देखील जॉब पूर्ण करायला हजेरी लावतो. ज्या ग्रुपसाठी ते हा जॉब पूर्ण करात असतात, त्या ग्रुपला इतर कार्स सोडून फक्त आणि फक्त एकाच कार मध्ये (Ford GT4() इंटरेस्ट असल्याचे आता ह्या तिघांच्या लक्षात येते. त्यामुळे नेमकी तिच कार घेऊन डॉम मियाला पळवून लावतो. इकडे चिडलेल्या ग्रुपमध्ये आणि डॉम, ब्रायन मध्ये झालेल्या मारामारीत ग्रुपमधील झिझी नावाच्या माणसाच्या हातून काही फेडरल एजंटस मारले जातात. ब्रायन आणि डॉम पळून जाण्याच्या प्रयत्नात ह्या सगळ्या जॉब मागे असलेल्या एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बिझनेसमनच्या रे च्या हातात सापडतात. अर्थात त्याच्या गुंडांच्या तावडीतून देखील ते पळून जाण्यात यशस्वी होतात.



आता शोध सुरू होतो की ह्या कारमध्ये नक्की असे काय आहे की ज्यासाठी हा पूर्णं प्लॅन रचला गेला होता. इकडे परत येऊन मिळालेला विन्सी त्या कारमधून एक कॉम्प्युटर चीप चोरताना त्यांच्या ताब्यात सापडतो. विन्सीला हाकलल्यावर आता त्या चीप मध्ये नक्की काय आहे ह्याची माहिती घ्यायला सुरुवात होते. त्या चीप मध्ये रे च्या संपूर्ण काळ्या साम्राज्याची माहिती आणि त्याने ठिकठिकाणी लपवलेल्या एकूण १०० मिलियन डॉलर्सची माहिती देखील असते.

इकडे ट्रेनमध्ये झालेल्या खुनांचा आळ डॉम आणि ब्रायन वरती येतो आणि ते मोस्ट वाँटेडच्या यादीत अग्रभागी विराजमान होतात. आपल्या एजंट्सच्या हत्येने पिसाळून उठलेला ल्यूक हॉब्ज (द रॉक) आता ह्या दुक्कलीला पकडण्यासाठी ब्राझील मध्ये दाखल होतो. डॉमच्या ठिकाणाचा पत्ता लागल्याने रे चे गुंड त्यांच्यावरती हल्ला करतात. पोलिस आणि रे अशा कचाट्यात सापडलेला डॉम आपण वेगळे होऊ आणि लवकरात लवकर रिओ सोडू असे सुचवतो. मात्र तेव्हाच मिया आपण प्रेग्नंट असल्याचे सांगते आणि परिस्थिती बदलते. शेवटचा जॉब म्हणून रे चे १०० मिलियन्स चोरायचे आणि ह्या सगळ्याला कायमचा राम राम ठोकून नवे आयुष्य सुरू करायची कल्पना डॉम सुचवतो. आणि मग सुरू होतो शोध ह्या शेवटच्या जॉबसाठी मदतनिसांचा. विन्सी देखील पुन्हा येऊन मिळतो.



मदतनीस मिळतात, जॉबची आखणी देखील होते मात्र पहिली टीम जॉबसाठी बाहेर पडते आणि इकडे डॉम आणि साथीदारांना ल्यूक अटक करतो. आता अटक केलेल्या सर्वांची अमेरिकेला रवानगी करण्यासाठी ल्यूक त्यांना गाडीतून घेऊन निघतो आणि त्या गाडीवरच रे च्या माणसांकडून हल्ला होतो. जवळ जवळ सर्वच साथीदार मारले गेल्यावरती डॉम व मंडळी कशीतरी ल्यूकची सुटका करतात आणि त्याला आपल्या ठिकाण्यावर घेऊन येतात. आता बदललेला ल्यूक देखील ह्या जॉब मध्ये सामील होतो आणि एकच भन्नाट वेग कथेला मिळतो.

शेवटी चोरी होते का? चोरीच्या पैशाचे नक्की काय आणि कसे होते, रॉक नक्की जॉब मध्ये सामील होतो ? का त्याचा सतःचा काही वेगळा अजेंडा असतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटाकडूनच मिळवण्यात मजा आहे.



विन डिजेलची थंड नजर, द रॉकचे सुसाट संवाद, पॉल वॉकरची गजब बुद्धिमत्ता आणि धुमशान मारामार्‍या, जबरदस्त कार स्टंटस, चोरीसाठी वापरलेल्या युक्त्या एकूणच धमाल ही धमाल. ह्या सर्व फटाक्यांची आतषबाजी एकत्र पाहण्याची मजा खरंच काही और आहे.

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११

ए टेल ऑफ टू सिस्टर्स



द ग्रज पाहिल्यानंतर जापनीज आणि कोरिअन हॉरर चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता वाटू लागली होती. भयपट बघायचे तर जापनीज किंवा कोरिअनच असे जणू ठरवून टाकले आहे. ह्याच चित्रपटांच्या रांगेत परवा अचानक 'ए टेल ऑफ टू सिस्टर्स' हा कोरिअन चित्रपट हाताला लागला आणि कधी एकदा पाहून संपवतो असे झाले. हॉरर चित्रपटांची आवड असणार्‍या लोकांसाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणी आहेच पण सायकोलॉजीकल थ्रिलरची विशेष आवड असणार्‍या रसिकांना हा चित्रपट एक वेगळाच अनुभव देऊन जातो. चित्रपट पाहून काही काळ आपण खरेच सुन्न होऊन जातो. ह्यातले काही काही शॉट किंवा अचानक कथेला कलाटणी देणारे क्षण आपण बर्‍याच हिंदी, इंग्रजी चित्रपटात नक्की पाहिले असतील. मात्र हे सगळे शॉट आणि ही वळणे एकाच चित्रपटात पाहण्याची मजाच वेगळी.

सू-मी ह्या मुलीला एका मानसोपचार तज्ज्ञासमोर आणले जाते इथून पुढे तिच्याकडून तिची स्वतःची, तिच्या कुटुंबाची आणि एकूणच चित्रपटाची एक रहस्यरंजक आणि खुर्चीला खिळवून ठेवणारी कहाणी उलगडत जाते.

सू-मी आपल्या सू-येओन* ह्या लहान बहिणीसमवेत आपल्या घरी परत आलेली असते. ह्यावेळी तिच्या स्वागताला तिचे वडील आणि नवीन सावत्र आई दोघेही हजर असतात. सावत्र आई विषयी दोन्ही मुलींच्या मनात अढी असतेच त्यात आता आपली सावत्र आई काहीतरी विचित्र आणि गूढ वागते आहे ह्या अनुभवाने तिच्याविषयी अधिकच संताप दाटू लागतो. आल्या दिवशी पहिल्याच रात्री सू-येओनला आपल्या खोलीत कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे असा भास होतो आणि ती घाबरून आपल्या बहिणीच्या खोलीत जाऊन झोपते. आपल्या लहान बहिणीला असे घाबरवण्यामागे आपल्या सावत्र आईचाच हात आहे ह्याबद्दल सू-मी ला मात्र शंका नसते.



दोन्ही मुली घरी परत येतात आणि अचानक बर्‍याच चित्रविचित्र घटना घडायला लागतात. त्याच रात्री सू-मी ला देखील एका भयानक स्वप्नाला सामोरे जावे लागते ज्यात तीच्या खर्‍या आईसारखी दिसणारी एक विचित्र भितीदायक स्त्री तिच्या बेडवर रांगत रांगत चढते. घाबरलेली सू-मी दचकून जागी होते आणि ह्या घरात नक्की काहीतरी विचित्र चालले आहे ह्याची तिला खात्री पटते. सावत्र आईच्या पाहुण्या येणार्‍या भावाबरोबर आणि त्याच्या बायकोबरोबर जेवण करायला दोघीही नकार देतात आणि सावत्र आईच्या रागात अजूनच भर पडते. जेवता जेवता सावत्र आईच्या वहिनीला अचानक फिट येते. फिट येऊन ती वळवळत असतानाच अचानक पडल्या पडल्या तिचे लक्ष सिंक च्या खाली जाते आणि भितीने थरारुन उठते. परत जाताना आपल्या नवर्‍याला ती आपण सिंक खाली एक जळालेली मुलगी पाहिल्याचे सांगते.



इकडे सावत्र आईला आपल्या आवडत्या पक्षांपैकी एक मेलेला आढळतो तर दुसरा मेलेला पक्षी सू-येओन च्या बिछान्यात सापडतो आणि तिच्या रागाचा स्फोट होतो. ती रागारागाने तिला अंधार्‍या कपाटात बंद करून ठेवते. इकडे अचानक काही आवाजाने जाग आलेली सू-मी आपल्या बहिणीच्या खोलीत येते. तिथे बहिणीला नसलेले पाहून ती काळजीत पडते, पण शेवटी ते आपल्या बहिणीला शोधून काढतेच. दोघी एकमेकींना मिठ्या मारून अश्रूंना वाट करून देतात. काही वेळाने दूसर्‍या पक्षाला व्यवस्थित पुरून त्यांचे वडील परत येतात तेव्हा सू-मी आपला सगळा संताप त्यांच्या समोर व्यक्त करते. शेवटी चिडलेले वडील सू-मी वर खेकसतात आणि "हे सगळे प्रकार तू कधी बंद करणार आहेस ? तुला बरी व्हायचे नाही आहे का?" असे विचारतात. सू-मी त्यावर आपली सावत्र आई लहान बहिणीवर सतत कसे अत्याचार करत असते ह्याचा पाढाच वाचते. आता मात्र संतापलेले वडील सू-मी वार खेकसतात आणि म्हणतात "ह्या सगळ्यातून बाहेर ये, प्लीज. सू-येओन मेलीये. ती कधीच मेली आहे, आत तरी ह्या सत्याचा स्वीकारा कर." हा शॉट संपतो आणि कथा एक वेगळेच वळण घेऊन आपल्याला गुंगवून टाकते.



दुसर्‍या दिवशी आपली बहीण पुन्हा नाहिशी झाल्याचे सू-मी च्या लक्षात येते आणि आपण राहून राहून आपल्या आईला एक रक्ताळलेले पोते ओढून नेताना पाहिल्याचे तिला आठवत राहते. आपल्या बहिणीची सुटका करण्यासाठी ती धावते मात्र पुन्हा सावत्र आई मध्ये पडते आणि त्यांच्यात जोरदार झटापट होते. थोड्या वेळाने तिचे वडील परत येतात मात्र तोवर सगळे अस्ताव्यस्त घर अगदी व्यवस्थित दिसत असते. मग नक्की त्या घरात घडलेले तरी काय असते आणि घडत तरी काय असते ?



कथा ह्यापुढे अनेक वळणे आणि फ्लॅशबॅक घेत जाते आणि आपल्याला थक्क करून सोडते. दोन्ही बहिणींचा सावत्र आई ही त्यांच्या वडिलांची एकेकाळची सहकारी असते आणि त्यांच्या आजारी आईची देखभाल करण्यासाठी घरी राहतं असते हे सत्य फ्लॅशबॅक मधून समोर येते. आणि त्याच वेळी त्यांची खरी आई आणि लहान बहिणीबद्दल काय घडले हे देखील सामोरे येते.

सू-मी खरंच वेडी असते, आणि ह्या सगळ्या कल्पना रचत असते ? का खरंच त्यांच्या सावत्र आईने लहान बहिणीची हत्या केलेली असते ? सिंक खाली जळालेली आणि रांगत हिंडणारी मुलगी नक्की कोण असते ? सू-मी ची खरी आई भूत होऊन त्यांच्या घरात वावरत असते का ? का ह्या सगळ्या भूमिका एकटी सू-मी स्वतःच जगत असते ? ह्या आणि अशा अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे कशी मिळत जातात ते चित्रपटातच बघण्यात खरी मजा आहे.



चित्रपट सगळ्याच अंगांनी सुंदर बनवलेला आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो सतत धक्के देणारी कथा आणि कॅमेर्‍याच्या अतिशय सुरेख केलेला वापर. चित्रपटाबरोबर उपलब्ध असणारी सबटायटल्स देखील उत्तम. अर्थात सबटायटल्स शिवाय हा चित्रपट कळण्याची सुतराम शक्यता नाही हे मात्र खरे. भयानक चेहरे, कर्णकर्कश्य संगीत आणि उगाच अंधारी दृश्ये ह्या शिवाय देखील एक अतिशय थरारक चित्रपट आपल्या मनात भिती कशी उत्पन्न करू शकतो ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा.

बुधवार, १० ऑगस्ट, २०११

गुमराह

रात्रीचे १२ वाजायला आले असतील, बाहेर पावसाची रिपरिप चालू होतीच. आज बाहेर पाऊस असून देखील मला खिन्न खिन्न वाटत होते. खरेतर पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू. आज नेहमीप्रमाणे कॅफे बंद झाल्यावर कावेरी मातेचे यथासांग दर्शन देखील झाले होते, त्यामुळे हा पाऊस आणि अंगावर येणारी मस्त हवा आवडायला काहीच हरकत नव्हती. पण का कोणास ठावुक आज मन लागत नव्हते येवढे खरे. अचानक रात्री १२ च्या सुमारास फोन वाजला. येवढ्या रात्री मला सहसा कोणाचा फोन येणे अशक्यच. त्यात जागा असल्याने दुसर्‍या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून काही क्षण फक्त श्वासोच्छ्वासांचे आवाज ऐकू येत होते.

"पप्पी?"

मला पप्पी म्हणणारे आणि संपर्कात असणारे आता फार कमी उरले आहेत, अगदी बोटावर मोजण्याइतके. पप्पी अर्थात पॅपिलॉन हे नाव, ते नाव जिथे धुडगूस घालायचे ते विश्व आणि ते सोबती सोडून आत जमांना उलटला आहे. पॅपिलॉनचा परा होऊन आणि सरळ मार्गावर चालायला लागून बराच काळ लोटला आहे.

"बोलतोय..."

"पप्पी यार अपना गुमराह अल्लाह को प्यारा हो गया" पलीकडून अजून काही शब्द उच्चारले देखील असतील नसतील मी मात्र योग्य त्या शब्दांचा अर्थ लागताच सुन्न झालो होतो. टोटल ब्लॅंक ! गुमराह गेला ? कसे शक्य आहे ? "साला वो तुम्हारे पंडित लोगोंका चित्रगुप्त हमारे कौम का भी हिसाब लिखता है क्या ? उसको बोल ना के साले कंप्युटर यूज करना शुरु कर दे, तो मै उसके कंम्प्युटर मे भी घुसके अपना अकाउंट क्लिअर करू" म्हणणारा गुमराह गेला ?

"सुन बे पंडित, मै मरुंगा तो इधर किधर कंम्प्युटर के पास बिजली का झटका लग के, या फीर किसी सरकार की गोली से" म्हणणारा गुमराह गेला.. "अबे तेरो को पढाई करके चष्मा लगा है या औरतो को घुरके?" विचारणारा गुमराह गेला.. अक्षरश: बातमी ऐकून बाहेरच्या पावसाला लाजवेल असा आठवणींचा पाऊस माझ्या अंगावर कोसळायला लागला.

गुमराहची आणि माझी पहिली भेट झाली ती इंडोपाक चॅट चॅनेल मध्ये. मी नवीनं नवीनं कॅफे सुरू केला होता आणि दिवसभर टायपिंग, डेटा एंट्रीची किरकोळ कामे संपली की आम्ही एकलव्याच्या निष्ठेने वेगवेगळे फोरम पालथे घालत हॅकिंगचा अभ्यास करत होतो. थोड्याफार दिवसात माझ्या सारख्याच किंवा थोड्यास सीनिअर अशा अजून दोन चार हॅकर मित्रांशी ओळख झाली आणि मी खर्‍या अर्थाने ह्या हॅ़किंग विश्वाच्या एका कोपर्‍यात आत पाऊल टाकले. 'अमन की आशा' वगैरेचे फॅड निघाले देखील नव्हते तेव्हा काही भारतीय व पाकिस्तानी चाटर्सनी एकत्र येऊन इंडोपाक चाट चॅनेलचा घाट घातला. इतरांबरोबर मग मी देखील ह्या चॅनेलमध्ये दिवसभर पडीक राहू लागलो. चॅनेल सुरू झाला, चांगला प्रतिसाद देखील मिळायला लागला आणि अचानक एके शुक्रवारी चॅनेल हॅक झाला. कोणालाच चॅनेल मध्ये प्रवेश करता येईना, चॅनेल सांभाळायला ठेवलेले बॉट सुद्धा लाथ मारून चॅनेल बाहेर काढले गेले होते. चॅनेलचे ओनर आणि ऑपरेटर अथक प्रयत्न करत होते पण काही उपयोग होत नव्हता. आश्चर्य म्हणजे शनिवारी पुन्हा सर्व सुरळीत चालू झाले. पण हा आनंद फक्त पुढील गुरुवार पर्यंतच टिकला. शुक्रवारी पुन्हा चॅनेल हॅक....शनिवारी पुन्हा सर्व सुरळीत.

शुक्रवारच्या निवडीवरून आपोआपच सर्व नजरा पाकिस्तानी चाटर्सकडे संशयाने वळल्या, मात्र आपलेही काही महाभाग शुक्रवारच्या आडून हे करत असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था झाली होती. आता चॅनेलचे सिक्युरिटी गार्डस जोमाने कामाला लागले होते, बॉटसची नव्याने बांधणी सुरू झाली होती, नव्या दमाच्या हॅकर्सना भरती करण्यात येत होते आणि त्यात आमचा नंबर पण लागला. काम असे विशेष काही नव्हते, बॉटच्या निकनेममधून लॉगईन करायचे आणि चॅनेलवरती नजर ठेवायची. पण आपल्या कामात काम ठेवणार्‍यातला मी थोडाच होतो ? बॉट मागे बसल्याने लोकांचे आयपी, त्यांचे जुने बॅन सगळे मला अगदी तपशीलवार दिसायचे. काही संशयितांच्या संगणकात परस्पर शिरून काही माहिती मिळते का बघण्याचा प्रयत्न मी सुरू केला, पण पहिल्याच प्रयत्नात तोंडावर पडलो. माझीच OS क्रॅश झाली आणि सर्वरचीच OS क्रॅश झाल्याने कॅफे दिवसभर बंद ठेवावा लागला तो वेगळाच. ह्यातून पहिला धडा मिळाला म्हणजे कुठलेही किडे करण्यासाठी सर्व्हरचा उपयोग करायचा नाही.

आता प्रतीक्षा होती ती ह्या शुक्रवारी काय होते त्याची. चॅनेल अ‍ॅडमिन्सनी घेतलेल्या कष्टाला काही फळ मिळते का नाही ते ह्या शुक्रवारीच कळणार होते. शेवटी एकदाचा शुक्रवार उजाडला.. आणि गंमत म्हणजे काहीही न घडताच सुरळीत पार देखील पडला. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शनिवारी सकाळी चॅनेल अ‍ॅडमिन मध्ये एका नवीनं नावाची भर पडली होती 'गुमराह'. मला हे नाव तसे नवीनं होते पण रुळलेल्या लोकांना मात्र चांगलाच धक्का देणारे होते. सर्व ऑपरेटर्सना नवीनं नेमलेल्या अ‍ॅडमिनचा परिचय करून देणारा मेसेज पाठवण्यात आला होता. गेले काही शुक्रवार नियमितपणे चॅनेल हॅक करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा गुमराहच होता आणि तो फक्त चॅनेल अ‍ॅडमिन्सना चॅनेलच्या सिक्युरिटी विषयी अजून सतर्क करत होता. चेन मेसेज मध्ये हा 'गुमराह' बर्‍याच जणांच्या ओळखीचा होता हे कळून आले. गंमत म्हणजे मेसेज मध्ये नाहीच पण त्यानंतर देखील कधीही मी कोणाला गुमारह बद्दल वाईट बोलताना कधीच पाहिले नाही. 'गुमराह' मुसलमान आहे ही सगळ्यांची खात्री होती, मात्र तो कुठला आहे काय करतो ह्या विषयी भल्या भल्यांना खबर नव्हती.

सर्वांनी त्या मेसेज मध्ये 'गुमराह' चे अभिनंदन करून झाल्यावर सगळ्यात शेवटी सगळ्यांचे आभार मानणारा गुमराहचा मेसेज आला. त्यात सगळ्यांचे आभार मानून सर्वात शेवटी 'पप्पी लूं' ( हे माझ्या पॅपिलॉन नावाचे त्याने शेवटपर्यंत काढलेले वाभाडे) माझ्या संगणकात शिरल्याने मी घाबरून गुन्हा कबूल केला आणि प्रायश्चित्त म्हणून अ‍ॅडमिन झालो असे लिहिले होते. च्यायला ! म्हणजे माझ्या पहिल्याच प्रयत्नात मी शार्कलाच जाळ्यात पकडायला गेलो होतो तर. मला तो मेसेज वाचून भयानक लाजल्यासारखे झाले. माझ्या मेसेज मध्ये मी सगळ्यांसमोर गुमराहची माफी मागून मीच कसा तोंडावर पडलो हे अनिच्छेने कबूल करून मोकळा झालो. पुढचे दोन दिवस मी चॅनेल मध्ये फिरकलोच नाही. एक तर मला वाटत असलेली लाज आणि दुसरे म्हणजे बॉट मधून मिळालेल्या माहितीचा दुरुपयोग केल्याने ऑपरेटर वरून लाथ तर मिळणार होतीच कदाचित चॅनेल मधून बॅन केले जाण्याची देखील भिती होतीच.

पण व्यसने अशी सहजी सुटली तर काय हो... दोन दिवसांनी प्रॉक्सी वापरून दुसर्‍या निकनी आम्ही हळूच आजूबाजूचा माहौल चेक करायला चॅनेल मध्ये शिरलो. चॅनेल मध्ये शिरलो आणि "आजा पप्पी लूं" असा पहिलाच स्वागत मेसेज समोर आला आणि मी डोक्याला हात लावला. च्यायला हा गुमराह काय भूत आहे का काय ? का ह्याला कोणी कर्णपिशाच्च वगैरे वश आहे ? मनांतल्या मनात स्वतः ला चार शिव्या घातल्या आणि पुन्हा नेहमीच्या पॅपिलॉन निक मध्ये आलो. आश्चर्य म्हणजे ताबडतोब बॉटने मला ऑपरेटरचे साइन देऊन वर नेऊन बसवले. चला म्हणजे बॅन देखील झालेलो नाहीये आणि अजून ऑपरेटरदेखील आहे तर. थोड्यावेळाने प्रायव्हेट विंडो मध्ये गुमराहचा मेसेज दिसला आणि आमच्या हातपायाला पुन्हा घाम फुटला. काय करतो आता हा खवीस ? कुठून दुर्बुद्धी झाली आणि ह्याच्या शेपटीवर पाय दिला असे झाले. भितभितच मेसेज उघडला. "हॅलो पप्पी लूं , कैसा है पंडित ?" येवढाच मेसेज होता. "फाईन सर" येवढे लिहिले आणि मी पहिल्यांना तिथून पळ काढला. चाट करणारे सगळे हिंदू मग ते मद्रासी, मराठी, भय्ये कोणी असोत, ते ह्याच्यासाठी कायम पंडितच असायचे आणि इंडियातून चाट करणारे मुस्लिम म्हणजे 'कनिझ'. त्याचा भारतीय मुसलमानांवर का राग होता ते अल्लालाच माहिती पण तो कायम असा आवेशाने आणि तुच्छतेनेच त्यांच्याविषयी बोलायचा.

दुसर्‍या दिवशी पुन्हा मी गेल्या गेल्या हा खवीस माझ्या मानगुटीवर बसलाच. त्याला माझ्याशी व्हॉईस चाट करायचे होते. आता आली पंचाईत ? पण शेवटी काय होईल ते होईल ठरवून मी त्याला माझ्या याहू आयडी दिला. याहूवर तर २४ तास पडीक असायचोच दूसर्‍या मिनिटाला गुमराह आयडीनेच फ़्रेंड रीक्वेस्ट आली आणि मी ती स्वीकारली. कॉल रिसिव्ह केला आणि एक गंभीर पण अतिशय शांत असा आवाज कानावर पडला 'सलाम पंडितजी.' मी खरेतर त्या आवाजाचे आज इतक्या वर्षांनी आणि इतक्या वेळा ऐकून देखील वर्णन करायला कायम कमीच पडत आलोय. काय असेल ते असेल पण त्याच्या आवाजात एक वेगळेपणा होता, ऐकत राहावे असा हुकुमी आवाज असायचा. थोड्या फार इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि खविसाने मुद्द्याला हात घातला.

"पप्पी लूं तू मेरे डब्बे मे (डब्बा हा संगणकासाठीचा त्याचा आवडता शब्द) घुसने के लिये कौनसा फंडा ट्राय मारा?"

इकडे आमच्या बोटांना कापरे आणी कपाळावरती घाम.

"ऐवे ही कुछ कुछ ट्राय मारा. पुराना ट्रिगर मिला था हॅकर्स पॅरेडाइ़ज की वेबसाइटपे उसको ट्राय मारा थोडा मॉडिफाय करके."

"दिखा जरा मेरे को उसका कोड." मी निमूटपणे कोड कॉपी पेस्ट केला. ५/१० मिनिटे गेली आणि तोच कोड पुन्हा त्याने मला पेस्ट केला. "सुनो पंडित अब ट्राय मारो."

मी सगळी तयारी करून भितभितच पुन्हा ट्राय मारला आणि स्क्रीनवरती वेगळाच डेस्कटॉप समोर आला. येस येस ! मला जमले.. मी गुमराहच्या संगणकात शिरलो होतो. हा आनंद काही सेकंदच टिकला कारण पुढच्या क्षणी माझा संगणकच शट डाउन झाला. पुन्हा संगणक चालू करून याहू वरती आलो आणि गुमान गुमराहला कॉल लावला.

"पंडित तेरे कोड मे गडबड थी मैने सुधार दी. लेकीन साला तेरा ट्रिगर डबल वे है. तू यहा घुसा तो उसी रास्तेसे मै भी वहा घुस सकता हूं"

"तो आब ?"

"ह्म्म्म्म चल कोइ नही, मै सिखा देता तुझे. सिखेगा दिल लगा के ?" गुमराहनी विचारले आणि मला स्वर्ग दोन बोटेच उरला.

गुमराह कोण आहे, काय करतो कशाकशाचे भान उरले नाही आणि मी अक्षरश वाहवलो गेलो. मी क्षणार्धात "हो" म्हणालो आणि त्या क्षणापासून गुमराहनी माझा हात हातात धरून माझ्याकडून हॅकींगची ABCD गिरवून घ्यायला सुरुवात केली.
हॅकींगचे एक अद्भुत विश्वच गुमराहनी माझ्यासाठी उघडे केले. मी देखील मन लावून शिकलो. ह्या काळात गुमराहची आणि माझी अगदी घट्ट मैत्री जमली, मात्र माझ्याजवळ आला तो जालावरचा गुमराहच. त्याचे खरे नाव, त्याचे काम, त्याचे कुटुंब कशाकशाचा त्याने मला कधी थांगपत्ता लागू दिला नाही. अर्थात त्याने देखील कधी माझी खाजगी चौकशी करण्याचा प्रयत्न केला नाही. कधी कधी तो माझ्याशी फोनवर देखील बोलायचा, मात्र कायम फोन करताना कटाक्षाने कॉलिंग कार्डचा वापर करायचा.

गुमराहकडून मी त्याच्या भात्यात होती नव्हती ती सगळी अस्त्रे शिकत गेलो आणि हळूहळू गुमराह काय चीज आहे हे माझ्या लक्षात येत गेले. गुमराह म्हणजे अक्षरशः हॅकिंगचे विद्यापीठ होते. कुठल्याही मोठ्या कंपनीने त्याला हसत हसत डोळे झाकून आयटी चा सिक्युरिटी हेड म्हणून सहज नेमले असते. हा मात्र कायम जालावरच पडीक दिसायचा आणि नोकरी करणार्‍यांना 'क्या बे गधे? आज तेरा धोबी मॅनेजर ऑफिस मे नही है क्या?" असे चिडवताना दिसायचा. ह्याचा अर्थ हा नमुना नक्की नोकरी करत नसावा असा आपला माझा अंदाज होता.

एका विशिष्ट टप्प्यावर गुमराहनी मला त्याच्या आंतरजालीय प्रॉपर्टीची ओळख करून दिली आणि मी बेशुद्धच पडायचा बाकी राहिलो. २ FTP, ३ वेबसाइट आणि २ ब्लॉगच्या साहाय्याने हा माणूस जगभरच्या संगणक वापरणार्‍यांवर अक्षरशः आपल्याकडचा खजिना रिकामा करत होता. संगणकात काही प्रॉब्लेम आहे ? , कुठले सॉफ्टवेअर हवे आहे? , कुठला कोड गंडला आहे?, हॅकिंग शिकायचे आहे? , व्हायरस हवे आहेत? सब मिलेगा... जिनी गुमराह के पास सब मिलेगा. HTML कोडस पासून ते त्सुनामी व्हायरस कोड पर्यंत आणि विनअँप पासून कटिया पर्यंत सर्व काही एका छताखाली ह्या अवलियाने उपलब्ध करून दिले होते. क्रॅक्स, सिरियल्स, मोर्स कोड, किजेन काय मिळत नव्हते ते विचारा. आणि हा पंटर हे सगळे एक हाती सांभाळत होता. गुमराहला प्रवासाचे, भटकंती करण्याचे फार आकर्षण होते. कार्स बाइक मधले त्याचे ज्ञान तर तोंडात बोटे घालायला लावणारे असायचे. दर दोन महिन्यांनी तो पॅरिस, अबुधाबी, चायना सारख्या कुठल्या ना कुठल्या सहलीला निघालेला असायचा आणि दर आठेक महिन्यांनी जुनी बाइक किंवा गाडी बदलून नवी दिमतीला हजर झालेली असायची. मग पुढचे १५ दिवस ह्या बाइकचे किंवा सहलीचे वर्णन ऐकवण्यात त्याचे खर्ची व्हायचे.

गुमराहचे आणि माझे सूर कसे काय जुळले काय माहिती पण तो माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवायचा हे मात्र खरे. मी देखील त्याच्या विषयी प्रचंड आदर बाळगून होतो आणि अजूनही आहे. आज मी जे काय ज्ञान मिळवले आहे त्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर गुमराहचा. गुमराहच्या तालमीत मी आता चांगलाच तयार झालो होतो. 'ह्या गुमराहला काही तरी मस्त गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे राव' असे मनातल्या मनात म्हणत असतानाच गुमराहने माझ्यावरती बाँब टाकला. एकेदिवशी सकाळी सकाळी गुमराहचा फोन आला. "पंडित तेरे मेरे जॉइंट याहू अकाउंटपे मैने मेरे सारे खजाने के पासवर्डस TXT मे लीख के रखे है, उसको लिट फाँट मे कन्व्हर्ट कर और फीर साले सारी जायदाद तेरी. और सून तय्यब को पेहचानता है ना? किसी को बोल मत लेकीन मेरा भांजा है वो. कोई भी मुसिबत हो तो उसके पास बोल दे."

"क्यूं ? सरकार आ गयी क्या आपको गोली मारने?" मी गमतीने विचारले.

"अल्ला हाफिज" बस्स येवढेच बोलून काही न बोलता गुमराहनी फोन ठेवून दिला. मला कल्पना पण नव्हती की हे माझे आणि गुमराहचे शेवटचे संभाषण असेल. त्या फोन कॉल नंतर गुमराह जो गायब झाला तो झालाच, पुन्हा कधी न दिसण्यासाठी. कोणी म्हणायचे त्याला पाकिस्तान सरकाराने अमेरिकेसाठी हेरगिरी करताना पकडले, कोणी म्हणायचे त्याला अमेरिकेने पकडून नेले तर कोणी म्हणायचे तो अल-कायदाला जोडला गेलाय. खरे खोटे कधी कळलेच नाही पण गुमराह नाहीसा झाला किंवा केला गेला हे सत्य मात्र उरलेच. खरे सांगायचे तर ह्या अफवा होत्या का सत्यकथा माहिती नाही पण मला तय्यबला काँटेक्ट करण्याचे धाडस झाले नाही हे मात्र खरे. अनेकदा मी त्याला मेसेज करायचा ठरवायचो आणि ऐनवेळी कच खायचो. काही महिन्यात तैय्यब देखील ऑनलाईन येईनासा झाला आणि गुमराहशी जोडणारा अदृश्य धागा देखील तुटला.

आणि आज इतक्या वर्षांनी हा तय्यब मला फोन करून सांगतो आहे की गुमराह गेला. तो मेल्याचे ज्या बाहेरच्यांचा कळवले जावे असे त्याची इच्छा होती त्यातला मी एकमेव होतो म्हणे. रात्र अक्षरशः सरता सरली नाही. सकाळी पुन्हा नंबर चेक केला तर तय्यबनी आपल्या मोबाईलवरूनच फोन केला होता. मी ताबडतोब त्याचा नंबर डायल केला, मला काय झाले कसे झाले सगळे सगळे जाणून घ्यायचे होते. रात्री जे बोलता आले नाही ते सगळे बोलायचे होते.

पण खरे सांगू, मी तय्यबला कॉल करायला नको होता. निदान माझ्या मनात मी ज्या मनमौजी गुमराहचे चित्र रंगवले होते तो जन्मापासून दोन्ही पायांनी पांगळा होता आणि शेवटी कॅन्सरचा घास होऊन मेला हे तरी मला कळाले नसते आणि माझ्या चित्रातले रंग उडून गेले नसते.

गुरुवार, ३० जून, २०११

रागिणी MMS



काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे. खरे सांगायचे तर चित्रपट सुरु झाल्यापासून हळूहळू आता हा सॉफ्ट पॉर्न कडे झुकतो का काय? असाच प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मध्यांतरानंतर तर चित्रपटाला ताण ताण ताणले आहे आणी तिथेच सगळी मजा निघून जाते.



रागिणीचा (कैनाझ मोतीवाला) मित्र उदय (राजकुमार यादव) तीला विकेंडसाठी शहराबाहेरच्या एका फार्महाऊस वरती घेऊन जातो. हे फार्महाऊस जंगलात असते. रागिणी आनंदात असते मात्र उदयच्या मनात काही वेगळेच विचार असतात. ऍक्टर व्हायची स्वप्ने बघणारा उदय आपल्या मित्र पंडित ह्याच्या साहाय्याने त्या फार्महाऊस मध्ये रागिणीची सेक्सटेप चित्रित करणार असतो. रागिणी मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असते.
इकडे बंगल्यात शिरल्या शिरल्याच आधी लाइट नसल्याचे कळते मग उदय एका अडगळीच्या आणि अंधार्‍या बोळातल्या खोलीत जाऊन स्विच शोधतो. त्याच खोलीत त्याला मॉनिटरवरती त्याच्या मित्राने संपूर्ण फार्महाऊसमध्ये विविध ठिकाणी लपवलेले कॅमेरे दिसतात. आनंदलेला उदय हॉल मध्ये येतो आणि ताबडतोब त्याच्या प्रेमचाळ्यांना ऊत येतो. रागिणी मात्र 'भूक लागलीये म्हणून ओरडत असते.' मग पॅक करून आणलेला डबा बाहेर काढला जातो ज्यात अचानक आळ्या निघतात. (हे राम !) मग शेवटी ते अन्न फेकून देण्यात येते. तोवर बरीच रात्र झालेली असल्याने आता दोघेही वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे मोर्चा वळवतात. (इथे प्रेक्षकही सावरून बसतात)



बाथरुम मध्ये रागिणी फ्रेश होईपर्यंत इकडे उदय टीव्ही मध्ये लपवलेल्या कॅमेर्‍याची सेटिंग वैग्रे अ‍ॅडजेस्ट करून घेतो. रागिणी बाहेर आल्यावर पुन्हा प्रेमचाळ्याना ऊत येतो... पण ह्या वेळी बंगल्याच्या दारावर थापा ऐकायला येऊन लागतात आणि पुन्हा आपल्या आणि उदयच्या रंग मे भंग होतो. हिलस्टेशनला निघालेले रागिणीचे मित्र पिया आणि उदय जाता जाता तिला भेटायला आलेले असतात. नुसते आलेले नसतात तर बिअर वैग्रे घेऊन पार्टिच्या तयारीनेच आलेले असतात. आता उदयची चिडचिड चालू होते, मात्र रागिणी त्याची समजूत काढते. पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच उदयला बंगल्याच काहीतरी विचित्र जाणवते, आसपास कोणीतरी वावरत आहे असे वाटायला लागते. त्याच्या मानेवर अचानक वार देखील होतो. गावात कोणीतरी सांगितलेली त्या बंगल्यातल्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या बाईला चेटकीण म्हणून मारल्याची आणि तिच इथे वावरत असल्याची गोष्ट त्याला आठवते. ती गोष्ट तो सगळ्यांना सांगून पियाला घेऊन तिथून पळ काढतो.
आता सगळी आवरा आवर करून पुन्हा उदय आणि रागिणी बेडरूम मध्ये (पुन्हा प्रेक्षकांच्या आशा पल्लवित) जातात. पुन्हा त्यांच्या प्रेमप्रदर्शनाला उत येतो. ह्यावेळी उदय रागिणीचे हात बेड्यांनी बेडला बांधतो आणि प्रेमाचा नवाच आविष्कार दाखवतो. त्यांचे प्रेम रंगात आलेले असतानाच उदयचे केस धरून त्याल कोणीतरी ओढते आणि दोघांचा थरकाप उडतो. त्या दोघांशिवाय अजून कोणीतरी आणि ते ही अमानवीय अस्तित्व आजूबाजूला वावरत आहे ह्याची त्यांना जाणीव होते. ह्यासर्वात बेड्यांची किल्ली हरवते, मोबाईलची बॅटरी संपते आणि शेवटी उदय झपाटला जातो आणि आत्महत्या करतो. आता उरते ते बेड्यांमध्ये हात अडकलेली असाहाय्य रागिणी आणि ते अस्तित्व...



पुढे काय होते ते चित्रपटातच बघण्यात खरी रंगत आहे. आता ती प्रत्येकालाच रंगत वाटेल असा माझा दावा नाही. चित्रपटातले अमानवीय अस्तित्व हे एका सो कॉल्ड चेटकिणीचे दाखवले असून ते मराठी भाषिक दाखवली आहे हे रहस्य उघड करायला हरकत नाही. तीचे 'मी चेटकीण नाही... मी माझ्या मुलांना मारले नाही..' चे पालुपद मात्र असह्य. खरे सांगायचे तर कैनाझचा एकूण मादक लुक आणि बोल्ड दृश्यात देखील तिने न लाजता दिलेली साथ ह्यासाठी सुद्धा हा चित्रपट बघायला हरकत नाही. हो..उगा ताकाला जाऊन भांडे का लपवा ? ती दिसली आहे मादक आणि अभिनय देखील बराच चांगला केला आहे. राजकुमार यादव देखील ठीकठाकच, मात्र त्याची घाबरल्याचा जो अभिनय केला आहे ना तो का कुणास ठावुक खदखदून हसवून जातो आपल्याला.


तर सांगायचा मुद्दा काय तर थरारपटाची म्हणून फार मोठी अपेक्ष न ठेवता नव्या चेहर्‍यांचा टैमपास चित्रपट म्हणून हा बघायला नक्कीच हरकत नाही.


मंगळवार, २१ जून, २०११

रेडी ? नो रेडी ssSSsss ...



वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती. (इथे 'अपेक्षा उंचावली होती' असे म्हणालेले नाही ह्याची नोंद घेतल्या जावी.) अगदी फुल्ल्टू धमाल नसेल पण निदान दोन अडीच तास जो काय चित्रपटाचा कालावधी असेल तो झकास जाईल ह्या कल्पनेने रेडीला हजेरी लावली.



सलमान, असीन, परेश रावल, पुनीत इस्सर, मनोज जोशी हे शिलेदार, महेश मांजरेकर, आर्य बब्बर, अनुराधा पटेल हे सैनिक आणि पाहुण्या भूमिकेत संजु बाबा, चंकी पांडे, आरबाज खान, अजय देवगण आणि झरीन खान अशी फौज असताना मस्त झणझणीत भेळेचा बकाणा भरायला मिळणार ह्या आशेने आम्ही स्थानापन्न झालो. खरंच सांगतो तुम्हाला चित्रपट सुरु झाल्यापासून १५ व्या मिनिटाला आम्ही 'चित्रपटालाच नाही तर पृथ्वीवरच का आलो ?' असा प्रश्न स्वतःला विचाराण्यायेवढे निराश आणि हताश झालो.

खरेतर परीक्षण आणि परिचयात चित्रपटात काय काय आहे हे रंगवून सांगायचे असते; पण इथे आमची झोळी रिकामीच असल्याने काय सांगायचे हा प्रश्नच आहे. आता चित्रपटात काय बघितले असे विचाराल तरी आठवून आठवून लिहावे लागेल. सांगायचे कशाबद्दल ? कथा = भिकार, म्हणजे खरेतर १०/१२ सुप्पर डूप्पर चित्रपटांच्या शॉट्सची मिळून विणलेली गोधडी. पटकथा = कथाच नाही हो., पटकथेचे काय डोंबल घेऊन बसलायत ? अभिनय = शंख ! अक्षरशः सगळ्या कलाकारांना वाया घालवले आहे. आणि सलमान तर असह्यच होतो. देव आनंद.. अगदी गेला बाजार मनोज कुमार देखील स्वतःचा चित्रपटात स्वतःवर येवढा वेळ कॅमेरा ठेवत नसतील येवढा चित्रपटभर सलमानवर केंद्रित आहे. (मनोजकुमार हा गेला बाजारच आहे आणि देव आनंद अजूनही तरुण आहे हे ध्यानात घ्यावे.)

बरं आता तुम्हाला स्टोरी सांगायची म्हणली तर ती चार ओळीत देखील मावायची बोंबाबोंब. सलमान एक 'मासूम चेहरेवाला कमींना' असतो आणि त्याचा बाप महेश मांजरेकर हा करोडपती असतो आणि विनाकारण विनोद निर्मितीसाठी तो विसराळू देखील असतो. तो नक्की काय धंदा करत असतो हा भाग अलाहिदा. तर ह्या सलमानचा एक भरापुरा परिवार असतो. २ काका , २ काकवा, २ नोकराणी, एक कुत्री इ. इ. कुटुंबाचे एक गुरुजी देखील असतात, ज्यांच्या सल्ल्यानेच घरातली काडी इकडची तिकडे हालत असते. हे गुरुजी सलमान अर्थात प्रेम साठी पूजा नावाची एक कन्या निश्चित करतात आणि तीला एयरपोर्ट वरून आणायची जबाबदारी अर्थात प्रेमवर येते. मग साहेब मुद्दामून वेगळ्याच टर्मिनलवर जाऊन उभे राहतात आणि पूजा विषयी काकाशी गप्पा मारत बसतात. इकडे स्वतःचे लग्न मान्य नसल्याने पळून आलेली आणि माफिया कुटुंबाशी निगडित असलेली असीन अर्थात संजना ह्याचे बोलणे ऐकते आणि पूजा असल्याचा बनाव करून प्रेमच्या घरात आश्रय घेते.



मग सलमानचे असीन वर आणि असीनचे सलमानवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न अ‍ॅज युज्वल सुरु होतात. मग अचानक सलमानला असीनच्या सच्चाईचा पत्ता वैग्रे लागतो आणि मग लवकरच दोघांना आपण एकमेकांच्या प्रेमात पडल्याचा साक्षात्कार देखील होतो. मग हळूहळू संजनाच्या कुटुंबाची ओळख होते. तीचे दोन्ही मामा तिच्या २०० करोड रुपायाच्या फॅमिलीसाठी तीचे लग्न आपापल्या साल्यांबरोबर लावायच्या तयारीत असतात. हे दोन्ही मामा सख्खे भाऊ असूनही पक्के वैरी असतात बरे. पण अ‍ॅज युज्वल त्यांच्या बायका सोशिक, प्रेमळ आणि परिवाराला एकत्र आणण्याची इच्छा असलेल्या वैग्रे असतात. ह्या दोन्ही मामांचा अकाउंटंट म्हणजे परेश रावल. ह्या परेश रावलचा भाचा कम असिस्टंट बनून सलमान ह्या परिवारात प्रवेश करतो आणि मग पुढे काय होते ते सांगायची आवश्यकता नाहीच...



सलमाननी चित्रपटभर अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे जो अ‍ॅज युज्वल जमलेला नाही. सौथ फायटींग पुरता तो एकदम झकास, पण चित्रपटात अ‍ॅक्शन देखील चवीपुरतीच आहे. मुळात चित्रपट अ‍ॅक्शन करावा, रोमॅंटीक करावा का विनोदी करावा हेच लक्षात न आल्याने दिग्दर्शकाची प्रचंड गोची झाल्याचे चित्रपटभर जाणवत राहते. शेवटी त्याने हे सगळे एकत्र करून भेळ बनवण्याचा अतिशय केविलवाणा प्रयत्न केलेला आहे हे सतत जाणवत राहते. ना धड विनोद जमलाय, ना धड रोमांस. अभिनयाचा शंख कसा वाजलाय ते सांगायलाच नको. असीनचे १/२ क्लोजअप घेऊन बाकीच्या चित्रपटभर तिच्या ऐवजी राखी सावंतला घेतले असते तरी खपून गेले असते येवढी असीन ह्यात दुर्लक्षित आहे. महेश मांजरेकरला प्रत्येक वाक्यात एक शब्द विसरायला लावून काय विनोद घडवायचा प्रयत्न केला आहे ते शेवटपर्यंत समजत नाही आणि हसवत त्याहून नाही. परेश रावल एखाद दोन प्रसंगात मस्त धमाल करून जातो पण इतर दगडांची साथ न मिळाल्याने शेवटी फिकाच पडतो. पुनीत इस्सरच्या भूमिकेला देखील पाहुणी भूमिका का म्हणू नये हा अजून एक प्रश्न. अनुराधा पटेलचे बर्‍याच दिवसानंतरचे रुपेरी दर्शन सुखावह हेच त्यातल्या त्यात एक नशीब.



सर्वात डोक्यात जातो तो सुदेश लेहरी. ह्या माणसाची भूमिका अक्षरशः विनाकारण आणि पाचकळपणासाठी घुसडलेली आहे हे स्पष्ट जाणवते. कॉमेडी सर्कस गाजवलेला हा कलाकार इथे अक्षरशः फुकट गेला आहे. अभिनयातला तोचतोचपणा आणि मूर्खासारख्या चेहर्‍याने केलेला वावर अतिशय भिकार. जॉनी लिव्हरची जागा घ्यायला त्याला अजून काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत हे मात्र निश्चित.



चित्रपटाला विनोदी म्हणता येईल असा एकही प्रसंग चित्रपटात नाही. तसा रोमँटिक प्रसंग देखील नाहीचे म्हणा. पात्राचे विचित्र हावभाव, एकमेकांना स्विमिंग पूल मध्ये ढकलणे, माफिया म्हणवले जाणारे आणि जोकर्स सारखे वावरणारे, बोलणारे गुंड आणि पाण्यात पडल्यावर 'मेरा वो गीला हो गया...' ह्या सारख्या संवादांना जर विनोदी म्हणले जात असेल तर मात्र आमचा साष्टांग नमस्कार आहे. अजय देवगण, संजुबाबा, झरीन सारख्या पाहुण्या कलाकारांना तर चित्रपटाच्या पहिल्या ५ मिनिटातच टाटा बाय बाय करण्यात आलेले आहे.

'ढिंक चिका..' हे एकमेव गाणे जे सतत ऐकून ऐकून कान किटलेत, ते सोडले तर एकही गाणे लक्षात राहतं नाही. प्रितम आणि देवी श्री प्रसाद ह्या दोन दिग्गजांनी दिलेले संगीत सतत ह्या आधी कुठेतरी ऐकले असल्याचे मात्र सतत जाणवत राहते. अनिस बझ्मी ह्याचेच ह्या चित्रपटाला डायरेक्शन आहे हे काय मनाला पटत नाही बॉ ! साफ फसला आहे हा माणूस.
एकूण काय तर अपेक्षा ठेवून अथवा न ठेवून देखील रेडी मनोरंजन करण्यात साफ अपयशी ठरतो.