बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

!! मोरया !!



बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या. किरकोळ बदल सोडता अवधूत गुप्ते ह्यांनी झेंडाचीच टीम इथे उतरवलेली आहे.

कथा-पटकथा-संवाद अशी तिहेरी जबाबदारी सचिन दरेकर ह्यांनी सांभाळलेली असून, अतुल कांबळे आणि अवधूत गुप्ते ह्यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. दिग्दर्शन म्हणून पुन्हा एकदा अवधूत गुप्तेच आहेत. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, परी तेलंग, संतोष जुवेकर, मेघना एरंडे, धनश्री कोरेगावकर अशी तरुण आणि अभिनयसंपन्न स्टारकास्ट आहे. अर्थात ह्यातील परी तेलंग व मेघना एरंडे ह्यांच्या भूमिका प्रमुख भूमिका म्हणून का गणल्या गेल्या आहेत हा मोठा प्रश्नच आहे.


गणेशोत्सव, त्याचे पावित्र्य, गणेशाच्या उत्सवात शिरकाव करून बसलेल्या वाईट प्रथा, गणेशोत्सवाच्या आधारे चालवले जाणारे राजकारण आणि एकूण राजकारण्यांची प्रवृत्ती अशा सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न म्हणजे 'मोरया' हा चित्रपट. कथेच्या जोडीला चाळीचे बिल्डिंगमध्ये रुपांतर, दोन चाळींमधला आपलाच गणपती कसा मोठा ह्यासाठी होणारा संघर्ष, तरुणाईची सध्याची तगमग असल्या पटकथांची देखील जोड आहे. मुळात कथाच दमदार नसल्याने ह्या पटकथा देखील तिला टेकू देऊ शकलेल्या नाहीत. ना भरभक्कम कथा, ना पटकथा, त्यातच संवादात देखेल फारसा दम नसल्याने अनेक गुणी कलाकार असूनही हा मोरया काही सुखकर्ता ठरत नाही.

समोरासमोर परंतु एकाच जागेत असलेल्या गणेश चाळ व खटाव चाळ ह्या दोन चाळी. दोन्ही चाळींचे गणपती वेगळे, इतर सणवारही वेगवेगळे साजरे होणारे. लवकरच तिथे विकसन होणार असल्याने, बिल्डरने एकाच गणपतीसाठी मंदिराची सोय करण्याचे कबूल केले आहे. आता एकाच गणपतीची स्थापना ह्यापुढे दरवर्षी करायचे चाळकरी ठरवतात. दोन्ही चाळीतल्या तरुणांना मात्र हे मान्य नाही. एका चाळीच्या तरुणांचा नेता आहे चिन्मय मांडलेकर तर दुसर्‍या चाळीचा अर्थातच संतोष जुवेकर. ह्या दोन्ही चाळीतला शहाणा मनुष्य म्हणजे दिलीप प्रभावळकर. अर्थात दोन्ही गट त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. शेवटी ह्या वर्षी ज्या गटाचा गणपती जास्ती गर्दी खेचेल, जास्ती प्रसिद्धी मिळवेल तो टिकेल असा ठराव होतो आणि दोन्ही गट जीव तोडून मेहनतीला लागतात.




आता आपलाच गणपती टिकला पाहिजे ह्या ईर्ष्येने दोन्ही गट पेटून उठल्याने मग मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोला करण्याची चढाओढ सुरू होते. वेळेप्रसंगी मग त्यासाठी एका गटाकडून राजकारण्यांचा आसरा घेतला जातो तर एका गटाकडून चक्क मुसलमान मालक असलेल्या यात्रा कंपनीचे पोस्टर मांडवाबाहेर झळकवले जाते. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नाही नाही त्या मार्गांचे अवलंब करायला दोन्ही गट सुरुवात करतात. मग आपला गणपती नवसाला पावतो अशी संतोष जुवेकरच्या गटाने चॅनेलवरती खोटी जाहीरात करताच, चिन्मय मांडलेकरच्या गटाकडून त्यांनी लावलेले मुसलमानी पोस्टर आणि त्यांचा गणेशोत्सव कसा सर्वधर्म समभाव निर्माण करणारा आहे ह्याची जाहिरातबाजी केली जाते. त्याच वेळी चिन्मय मांडलेकर हा खरा मुसलमान, मात्र सच्चा गणेशभक्त असल्याचे दाखवून अवधूत गुप्ते आपल्याला छान चक्कर आणतो. डोक्याला हात मारून पुढे काय घडते ते बघण्याशिवाय आपल्या हातात काही नसते.



मग उरलेल्या काळात बाप्पासाठी कार्यकर्ते कशी जीवतोड मेहनत घेतात, संतोष जुवेकर सारखे तडफदार [?] तरुण रजा मिळाली नाही तर नोकरी वरती लाथ कशी मारतात, दहा दिवस कार्यकर्ते बाप्पासाठी दारूचा त्याग कसा करतात इ. इ. आपण नेहमी वाचत असलेले आणि बघत असलेले प्रसंगच साकार होतात. त्यामुळे मधल्या वेळात थोडीशी डुलकी घेतली तरी चालेल.

हान तरा आता सरळ मार्गाने पुरेसे यश काही मिळत नाही म्हणल्यावरती दोन्ही गटाकडून गैरमार्गाचा वापर केला जातो. अर्थात त्याला पाठिंबा असतो तो राजकारण्यांचाच. एका गटाकडून दुसर्‍या गटाच्या मांडवामागे दारूच्या बाटल्यांचा ढीग ठेवला जातो आणि त्याचे चित्रीकरण करून चॅनेलवरती दाखवले जाते. अर्थात मग दुसर्‍या गटाकडून विरुद्ध गटाच्या मांडवाबाहेर लावलेल्या हिरव्या पोस्टरचे नुकसान केले जाते. ही घटना घडते आणि ताबडतोब शहरात दंगली उसळतात. मग दोन्ही धर्माचे राजकारणी त्याचा येणार्‍या निवडणूकीत कसा वापर करता येईल त्याच्या हिकमती लढवायला लागतात. शेवटी काय होते ? खरा गुन्हेगार सापडतो ? दोन्ही गटांना आपली चूक लक्षात येते ? आणि शेवटी गणपती कुठल्या गटाचा राहतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर 'मोरया' दर्शाना शिवाय पर्याय नाही. अर्थात आजकालच्या तुम्हा जाणकार मंडळींना असे प्रश्न पडतील असे वाटत नाही. ह्याची उत्तरे चित्रपट न बघताच तुम्हाला कळले देखील असतील.



बरं आता चित्रपटाचे येवढे पोस्टमार्टेम केल्यावर, चित्रपटात काही चांगले आढळलेच नाही का ? नक्की आढळले. स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर ह्या तरुणांचा अभिनय, त्यांचे लुक्स, त्यांची संवादफेक, कॅमेर्‍याचे ज्ञान सगळे सगळे आवडले. चित्रपटाचे चित्रीकरण, वापरलेले लोकेशन्स देखील झकास. शीर्षक गीत, दहीहंडी नृत्य देखील झकास जमले आहे. मात्र दिलीप प्रभावळकर ह्यांना अशी आगा पिच्छा नसलेली आणि जणूकाही समोपदेशकाच्या थाटाची भूमिका देऊन वाया का घालवले आहे ते कळत नाही. परी तेलंग, मेघना एरंडे ह्या देखील चॅनेल्सच्या निवेदकांच्या भूमिकेत छाप पाडू शकलेल्या नाहीत. अर्थात भूमिका मध्येच काही दम नसल्याने त्यांना दोष का द्यावा ? मुळात ह्या दोन चाळीतल्या गणेशोत्सवा शिवाय जगात काही घडतच नाहीये अशा ठाम मानसिकतेने ही चॅनेल्स चाळीतच ठाण मांडून का बसलेली असतात ते बाप्पालाच ठाऊक.



राकारण्याच्या भूमिकेत इथे पुन्हा एकदा ३/४ प्रसंगात पुष्कर श्रोत्री दर्शन देतो. त्याची भूमिकाच उद्धव ठाकरे टाईप लिहिली आहे, का तो अजून झेंडाच्या मानसिकतेतून बाहेरच पडू शकलेला नाही ते कळत नाही. चित्रपटात मध्येच एक मुसलमान नेता कम बिझनेसमनचे पात्र घुसडलेले आहे. कुठल्याच पात्राला एक ठाम अशी विचारधारा किंवा ज्याला ग्राउंड म्हणावे ते पुरवले गेलेले नाही. कुठलेच पात्र ठसठशीत झालेले नाही. स्पृहा जोशी फक्त गायला मिळते, गळ्याचा कस वगैरे लागतो म्हणून डान्सबार मध्ये गात असते हे तर पटता पटत नाही. चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर हे पोटापाण्यासाठी, रोज रात्री दारू पिण्यासाठी पैसे कुठून आणतात हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या बुद्धिसामर्थ्यावर सोडवावा.
एकुणात काय तर एकाच चित्रपटात सगळेच काही दाखवण्याचा अवधूत गुप्तेंचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा