गुरुवार, ५ एप्रिल, २०१२

ब्लड मनी

लिखाणाला सुरुवात करण्याआधी मला दोन अपराधांची क्षमा मागायची आहे. ते कन्फेशन का काय म्हणतात ना ते.

१) मी ब्लडमनी हा चित्रपट पैसे खर्च करून थेटरात जाऊन बघितला.
२) आणि वर मी आता त्याचे परीक्षण देखील लिहीत आहे.



ब्लड मनी हा महेश भट्ट साहेबांचा चित्रपट, अर्थात तो कुठूनतरी ढापलेल्या प्लॉटवरून तयार केलेला असणार हे उघड होतेच. त्यातून त्याला अभिनयसम्राट कुणाल खेमू आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता पुरी असल्याचे कळले आणि आम्ही ब्लड मनी विषयी वाचायचे देखील बंद केले. त्यातच एका मित्राकडून हा चित्रपट ब्लड डायमंडसवरून उचलल्याचे समजले. आता ब्लड डायमंड वरून उचलला आहे म्हणाल्यावरती एकदा बघायला हरकत नाही असा विचार मनात डोकावला आणि त्यातच ब्लडमनीचे पहिले पोस्टर रिलीज झाले. बघतो तर ते पोस्टर टाइम ट्रॅव्हलर्स वाइफची नक्कल. भट्ट गँग आजकाल चित्रपटच नाही तर पोस्टर्स देखील नक्कल करायला लागले आहेत, हे जीस्म २ पासून उघड झालेले आहेच. असो..



खरेतर चित्रपटगृहाबाहेर पोचल्या पोचल्या समोर एजंट विनोद आणि ब्लड मनी असे दोन पर्याय समोर आले. दोन्हीची तिकिटविक्री काही वेळाने १ तिकिटावरती २ तिकिटे आणि ४ सामोसे फ्री अशा अवस्थेत जाईल अशी होती. पण मी निग्रहाने 'एजंट विनोद' कडे काणाडोळा केला आणि ब्लड मनी कडे धाव घेतली. 'विनाशकाले विपरीत बुद्धी'. ह्या चित्रपटाचे नाव ब्लड मनी का ठेवले असावे ह्याचा उलगडा पहिल्या १० मिनिटातच झाला. दर्शकाच्या खिशातून पैसा आणि शरीरातून रक्त हे दोन्ही कमी करण्याचे कार्य हा चित्रपट करत असल्याने ह्याचे नाव ब्लड मनी.



कुणाल (कुणाल खेमू) हा एक फाटका तरुण, त्याचे आरझू (अम्रिता पुरी) वरती प्रेम असते. पण ह्याच्या फाटक्या चाळ्यांमुळे पोरीच्या घरचे लग्नाच्या विरोधात. मग दोघे पळून जाऊन लग्न करतात. लग्न झाल्याबरोबर कुणाल खेमूच्या हातावरच्या रेषा पुन्हा उजळतात आणि त्याला एकदम केपटाऊनमध्ये डायमंड एक्स्पोर्टचा बिझनेस करणार्‍या फर्म मध्ये जॉब मिळतो. त्या आधी कुणाल खेमू भारतात पिझ्झा डिलिव्हरी बॉय असतो म्हणे.



धर्मेश झवेरी (मनीष चौधरी) आणि दिनेश झवेरी ( संदीप सिकंद) हे दोन बंधू ह्या फर्मचे मालक दाखवलेले आहेत. खरेतर चित्रपटाच्या सुरुवातीलाच हा धर्मेश झवेरी कोणा एकाचा मार मार मारून, आपण किती कमीने आहोत ह्याचा पाढा वाचून खून करताना दाखवलेला असल्याने, कुणाल कुठे येऊन आदळला आहे हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच कळते. त्यामुळे अंधारात आजूबाजूचे चेहरे न्याहाळण्यासाठी आपल्याला पुढे बराच वेळ मिळून जातो. आल्या आल्या ह्या कुणालला एक लक्झरी बंगला राहायला मिळतो आणि एक ताबडतोब जीवाभावाचा मित्र देखील मिळतो. कंपनीत दाखल झाल्या झाल्या हा कुणाला करोडोंची डिल जी दिनेश झवेरीला करता येत नसते ती अशी चुटकीत करतो आणि धर्मेश तिवारीच्या गळ्यातला ताईत बनून जातो. ती डिल तो इतक्या बालिशपणाने करताना दाखवलेला आहे, की हा चित्रपट कुठल्याही 'झ' दर्जाच्या चित्रपटाची देखील नक्कल असण्याची शक्यता नाही हा अजून एक धक्का आपल्याला बसतो. आता कुणाल हा गळ्यातला ताईत झालेला असल्याने ताबडतोब धर्मेश झवेरी त्याला आपल्या घरी पार्टीला बोलावतो. ह्याच पार्टीत मग दिनेश झवेरी त्याची सेक्रेटरी मिया उएदा हिला कुणालच्या मागावरती सोडतो. ही भवानी संपूर्ण चित्रपटात भडक लिपस्टिक लावणे, आखूड शब्द देखील लांब वाटेल असे कपडे वापरणे आणि जाता येता कुणालच्या अंगचटीला जाणे ह्या शिवाय काहीही काम करताना दाखवलेली नाही. आता कुणालसमोर धर्मेश तिवारी एक पैशाचे जादुई जग उभे करतो, जिथे पैसा, मान मरातब, आलिशान गाड्या, दारू आणि जोडीला ही अवदसा अशी सगळी सुखे हात जोडून उभी असतात. त्यामुळे मग केपटाऊन मध्ये आल्या आल्या फक्त एखादं दोन दिवस बोंबलत हिंडल्यानंतर कुणाल आता आरझूच्या वाटेला येणे बंदच होते. त्याच्या पार्ट्या, त्याच्या रात्र रात्र चालणार्‍या मीटिंग्ज ह्यामध्ये तो व्यस्त होऊन जातो.




आरझू ही टिपीकल बायको असल्याने तिला ह्या सगळ्याचा त्रास सुरू होतो. अधे मध्ये कुणाल तिला लाडाने 'झू' वगैरे म्हणून समजूत काढण्याचा प्रयत्न करतच असतो पण ती काय ऐकायला तयार नसते. अशातच कुणालला आपला बॉस दिनेश तिवारी हा फ्रॉड करत असल्याचे लक्षात येते आणि तो मग सगळे आपल्या बॉसच्या कानावरती घालतो. अर्थातच बॉस लगेच त्याला एक उंची हॉटेलात जेवायला नेतो आणि एक बालिश लेक्चर आणि उदाहरण देऊन आपल्या कामाशी काम ठेवायचा सल्ला देतो. कुणाल मात्र 'मला सत्य समजलेच पाहिजे' अशी भूमिका घेतो. त्यातून त्याला आपल्या धंद्यात माफियांचा देखील समावेश असल्याचे कळते आणि तो हादरतो. पण पैशाची उब मिळालेला आणि चैनीला हपापलेला कुणाल हे सत्य मान्य करूनही आपल्या कामाला लाथ मारत नाही. उलट अजून जोमाने कार्यरत होतो. पुढे एका रात्री पार्टीत तो भरपूर दारू ढोसून आणि अंमली पदार्थ खाऊन मिया उएदाशी देखील रत होतो. (येवढा एकच प्रसंग जरा थोडा फार डोळे भरून बघण्यासारखा आहे. )





मग त्याच्या प्रगतीवरती जळणारा त्याच्या बॉसचा लहान भाऊ दिनेश त्याला त्याचे आणि मियाचे फोटो दाखवून ब्लॅकमेल करतो. उद्ध्वस्त अवस्थेत पोचलेला कुणाल मग आरझू पाशी सत्य काय ते स्वतःच बोलतो. ताबडतोब आरझू उन्मळून + कोसळून पडते आणि भारतात परतण्याचा निर्णय घेते. मधल्या काळात ती कुणालचा मित्र आणि त्याच्या बायकोकडे आश्रयाला जाते. इकडे कुणालला एक डिल डन करत असताना अचानक आपला बॉस दहशतवाद्यांसाठी देखील काम करत असल्याचे कळते. खरंच सांगतो, इतका मतिमंद प्रसंग मी आयुष्यात कधी मराठी सिनेमात किंवा रामसे बंधूंच्या सिनेमात देखील पाहिलेला नाही. हा दहशतवादी सरदार एका हिर्‍यांच्या खाणी पाशी ह्या कुणालची वाट बघत बसलेला असतो, त्याच्यासाठी पाठवलेल्या पेट्यांमधून बंदुका असल्याचे कुणालला तिथे लगेच तो बॉक्स असा काड्यापेटी सारखा उघडा पडल्याने लगेच समजते. इकडे ह्या दहशतवाद्याला भेटून ५/६ मिनिटात परत येत असतानाच त्याच बंदुका घेऊन ह्या दहशतवाद्याच्या माणसांनी केपटाऊनमध्ये अनेकांची हत्या केल्याची दृश्ये टीव्ही वरती दाखवली जायला लागतात.



इमॅजीन करा, कुणाल खेमू त्याच्या प्रायव्हेट प्लेन मधून केपटाऊन मध्ये पोचण्याच्या आधीच शस्त्रे पोचतात आणि दंगल पण होते.ह्या दंगलीत कुणालचा मित्र देखील मारला जातो. कुणाल पोचेपर्यंत त्याचे दफन देखील झालेले असते. आता देशाभिमान आणि मानवनेते पेटून उठलेला कुणाला आपल्या बॉसच्या विरोधात जातो. अता तो विरोधात जातो म्हणजे नक्की काय माकडचाळे करतो ते पाहायला आणि हो ह्या चित्रपटाचा 'न भूतो न भविष्यती' असा शेवट बघायला म्हणून का होईना तुम्ही थेटरामध्ये जायलाच पाहिजे. गेला बाजार टोरेंट तरी उतरवलेच पाहिजेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा