गुरुवार, १६ जुलै, २००९

अदभुत २

शामराव, माझ्या काकांचे दोस्त.. अचानक रस्त्यात गाठ पडले. कुठेतरी घाइघाईत निघालेल्या शामरावांना मी हाक मारली.
खरेतर मी तसा माणुसघाणा माणुस, कोणाला हाक वगैरे मारुन गप्पा मारणे अशक्यच. पण काहितरी विचित्र घडत होते. "शामकाका, अती घाई संकटात जाई, वाट बघा.शेवटी कापुसच मदतीला धावणार. विश्वास ठेवा." माझ्या तोंडातुन अचानक शब्द बाहेर पडले. मी काय बोलतोय हे माझे मलाच कळेना, अरे ते शामराव थांबतात काय, मी वेड्यासारखे काही बरळतो काय ? मला कशाचा अर्थच लागेना.

दुसर्‍या दिवशी दुपारी शामराव माझ्या कॅफेत हजर झाले. मी काही बोलायच्या आतच त्यांनी माझ्या पायाला हात लावला, "लेकरा वाचवलेस रे संकटातुन." शामराव म्हणाले.
मला काही अर्थबोधच होईना. नंतर शामरावांच्या तोंडुन कळाले की कर्जाचे तिनही हप्ते थकलेले, ह्यावेळीही कापसाने हात दिला नाही, अशा अवस्थेत शामराव आत्महत्या करायला निघाले होते. मला भेटले तेंव्हा ते टिक-२० खरेदी करुनच निघाले होते. मला भेटले, मी अचानक काहितरी बरळलो आणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का कोणास ठाउक माझ्या शब्दांवर त्यांचा इतका विश्वास बसला की त्यांनी खरेदी केलेली बाटली सुद्धा फेकुन दिली, आणी आज सकाळीच गुजरातचा व्यापारी येउन कापसासाठी सौदा करुन गेला होता.

मी सुन्नच झालो.....
---------------------------------------------------------------------------------------------

हे सुन्न होणे येव्हड्यावरच थांबणार नाहिये हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला. त्याच पंधरवड्यात अजुन दोन विस्मयकारक घटना माझ्या बाबतीत घडल्या. एकदा मला पार्कींग मध्ये असताना राजपाठक काकुंच्या घरच्या उघड्या राहिलेल्या गॅसचा वास आला, काकु राहतात ५ व्या मजल्यावार. बर हा वास कुठुन येतोय काय येतोय असले काहि फालतु विचार डोक्यात नाहीत, गॅसचा वास येतोय आणी तो राजपाठकांच्या घरातुन येतोय येव्हड्या स्वच्छ विचारांनी डोक्यात उगम घेतला आणी त्याक्षणी मी ५ व्या मजल्यावर धावलो.

"अरे मला तर काहिच कळाले नाही, बरे झाले तु आलास बाबा" काकुंच्या ह्या वाक्यावर कसनुसे हसत मी दाराबाहेर पडलो आणी शांतपणे जिन्यात बसुन राहिलो.

या घटनेला आठवडा उलटत नाही तोच एकदा रस्त्यानी जाताना मी अचानक सायकल थांबवली, रस्ता क्रॉस करुन पलिकडे गेलो आणी फुटपाथवर झोपलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला या बाजुला घेउन आलो. मी सायकलपाशी पोचतोय न पोचतोय तोवर पलिकडच्या फुटपाथवर लाईटच्या खांबावारची तार कोसळली.

मी भानावर आलो तेंव्हा रस्त्यावरुन जाणारी लोक थबकुन माझ्याकडे बघत होती, मी पटकन तिथुन काढता पाय घेतला. मला खरच काही सुचत न्हवते, हे सगळे जे घडत होते ते माझ्या बुद्धीच्या आवाक्या बाहेरचे होते. बर सल्ला तरी कोणाचा घेणार ?

शेवटी मीच त्रयस्थपणे ह्या घटनांचा अर्थ लावायला सुरुवात केली. हळुहळु लक्षात न आलेल्या बर्‍याच गोष्टी माझ्या ध्यानात येउ लागल्या. तसा मी देवभोळा वगैरे नाही पण रोज आंघोळ झाली की अंग पुसता पुसता अथर्वशीर्ष म्हणायचे हा माझा रिवाज , पण आजकाल मी अथर्वशिर्षाच्या जोडीने रामरक्षा आणी भिमरुपी सुद्धा म्हणायला लागलो होतो, फावल्या वेळात हळुच सविता भाभीवर वगैरे चक्कर मारणारा मी आजकाल नारदपुराण, स्कंदपुराणाचे दाखले संगणकावर शोधत होतो, आठवड्यातुन एकदा का होईना दोन घोट मारणारा मी आजकाल जवळजवळ निर्व्यसनी या समुहात मोडायला लागलो होतो. परमेश्वरा, हा येव्हडा बदल झालाय माझ्यात ? पुन्हा एकदा सुन्न झालोच झालो.

मी ह्या मनस्थीतीत असतानाच आमच्या गल्लीतल्या ग्रुपनी शनीवार रविवार सज्जन्गडावर जायची कल्पना काढली. हो नाही करत मी सुद्धा तयार झालो. खरतर मलाही थोडासा चेंज हवा होता. या सहलीत काही विचित्र माझ्या हातुन घडु नये येव्हडीच काय ती काळजी मनाला ग्रासुन होती. पण गंमत म्हणजे जस जसे सज्जन्गडाच्या जवळ जवळ पोचत होतो माझे मन एका अनामीक शांतीने भरुन जात होते, हि हि काहितरी एक वेगळीच अनुभुती होती, या आधी कधीही न अनुभवलेली. एखाद्या कल्पवृक्षाकडे आपण निघालो आहोत अशी काहिशी एक भावना मनात राहुन राहुन येत होती.

संध्याकाळच्या सुमारास गडावर पोचलो, हातपाय धुवुन व्यवस्थीत दर्शन घेतले. त्यानंतर प्रसादाच लाभ घेउन आम्ही आमच्या भक्त निवासातील खोलीवर परतलो. सगळ्यांनीच पत्ते खेळायची टुम काढली. मी मात्र आलो जर पाय मोकळे करुन म्हणुन पुन्हा खाली आलो. पुन्हा तोच प्रकार मनात नसताना शब्द बाहेर आले होते. आता खाली आलोच आहोत तर निदान गडाच्या दरवाजा पर्यंत तरी जाउन येउ असा विचार करुन मी निघालो.

"प्रसाद" मागुन एक अनोळखी हाक आली.
मी भांबावुन मागे बघितले, ३५/३६ वर्षाचे भगवी वस्त्रे परिधान केलेले एक स्वामी मला हाताने थांबायची खुण करत माझ्यापाशी पोचले.

"तुम्हाला थोडा वेळ असेल तर नानाजींनी तुम्हाला भेटायला बोलावलय" स्वामी म्हणाले.

"कोण नाना ? आणी तुम्हाला माझे नाव कसे काय कळाले ?" मी अडखळत बोललो.

"तुम्हाला बघुन मला नाना म्हणाने तो बघ तो बावळट प्रसाद कसा हिंडतोय ते, जा त्याला बोलावुन घेउन ये वेळ असेल तर" स्वामींनी उत्तर दिले.

आता मात्र मला खरच आश्चर्य वाटायला लागले, येव्हडे नावानीशी आपल्याला ओळखणारे सज्जनगडावर आहे तरी कोण हे बघायला मी स्वामींबरोबर निघालो.

"बार वगैरे मध्ये ठिक आहे हो, पण माझ्या सारख्याला सज्जन्गडावर नावनीशी ओळखणारे हे नाना कोण बुवा ?" मी प्रश्न केला.

"त्यांनाच का विचारत नाही हे तुम्ही?" स्वामीजी मिस्कीलपणे म्हणाले.
मग मात्र मी शांतपणे चालायला लागलो.

एका दुकानाच्या ओसरीवर पांढराशुभ्र सैलसर कुर्ता पायजमा घालुन एक साठीचे गृहस्थ बसले होते. का कोणास ठाउक पण त्यांच्यात काहितरी खास काहितरी वेगळेपण आहे हे मला राहुन राहुन जाणवत होते.

"नारायणा तु गेलास तरी चालेल हो" नाना म्हणाले. मी अवघडुन तसाच उभा होतो.

"काय प्रसादा झाला का सगळ्यांना प्रसाद वाटुन ? दमला नाहीस ना ?" नानांनी मिस्किलपणे हसत विचारले.

"प्रसाद ? मी नाही वाटला कोणाला" मी पटकन उत्तरलो.

"अरेच्या, बाजारात शामरावांना हाक मार, पाचव्या मजल्यापर्यंत धावत जा, कुत्र्याच्या पिल्लाला वाचव हे सगळे प्रसाद वाटणेच की लेका." नाना उदगारले.

मी त्यांच्याकडे पाहातच बसलो, मला काही सुचेचनात. कोणे हा माणुस ? ह्याला सगळे कसे कळाले ? हा खरच इथे राहतो का हा माझ्या पाळतीवर वगैरे आहे ? हा नक्की माणुसच आहे ना ? एकाच वेळी अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले.

क्रमशः


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा