मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

अल्लाह के बंदे

बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो. "नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव" पासून "भिकार पिक्चर आहे, नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय" पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या, पण 'स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले.



नसिरुद्दिन शहा, अतुल कुलकर्णी, सुहासिनी मुळे, विक्रम गोखले, झाकीर हुसेन अशी रंगमंचावर आणि पडद्यावर बाप असलेली स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला शर्मन जोशी, रुखसार, सक्षम देशपांडे आणि स्वतः फारुक कबीर अशी फौज. चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या होत्या. ह्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत चमकण्याबरोबरच फारुक कबीर ह्याने ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे.

मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला बसलो खरा पण खरे सांगायचे तर पदरात (का शर्टात? ) निराशाच पडली. अतुल कुलकर्णीचा आणि थोडाफार झाकीर हुसेनचा अपवाद सोडल्यास इतर दिग्गजांना अक्षरशः वाया घालवलेले आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे सारख्या ताकदीच्या कलाकारांची भूमिका तुकड्यातुकड्याने जोडली तरी ५ मिनिटांच्या वर भरणार नाही. सक्षम कुलकर्णीला देखील म्हणावे तसा वाव नाही. सगळ्यात वाईट वाटले ते नसिरुद्दिन शहा ह्यांना बालसुधार गृहाच्या जेलरच्या भूमिकेत बघून. एकही धड आणि पूर्णं दोन वाक्यांचा संवाद नाही, बोलका चेहरा हे त्यांचे जे प्रभावी अस्त्र आहे त्याचा कणभर देखील वापर करून घेतलेला नाही आणि सगळ्यात संतापाचे म्हणजे त्यांना दिलेला गेट अप आणि त्यांना भूमिका साकारताना एका पायाने लंगडत चालत असल्याचे दाखवणे. नसिर ह्यांची हि भूमिका अगदी तंतोतंत 'दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील पाकिस्तान तुरुंगाच्या जेलर असलेल्या 'के के' ह्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. मिळतीजुळती कसली? आपण 'के के' लाच पाहत आहोत असे वाटत राहते.



असो...

तर आता मूळ कथेकडे वळू. विजय आणि याकुब हे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या 'भुलभुलय्या' झोपडपट्टीत राहणारे दोघे अगदी जवळचे मित्र, सख्खे भाऊच म्हणाना. आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अनाथ याकुबला शेजारच्या सुहासिनी मुळेने वाढवलेले असते. तिचाच मुलगा म्हणजे विजय. शाळेच्या नावाखाली घराबाहेर पडणे आणि चरस विकून पैसा कमावणे हे ह्यांचे काम. बालगुन्हेगारी आणि झोपडपट्टीतले दारिद्र्य हा विषय ह्या चित्रपटाचा अग्रभागी असताना देखील हे दोन्ही विषय म्हणावे तसे प्रेक्षकांच्या समोर येत नाहीत. रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे. एका मिनिटासाठी दाखवलेले पायरेटेड सिडी, विषारी दारू, चरस, लोकांची विक्री हे धंदे म्हणजे झोपडपट्टीचे गुन्हेगारी विश्व नाही आणि 'भाई इसने अपुनका माल लिया वापस नही देता' म्हणणारी पोरे दाखवणे म्हणजे बालगुन्हेगारी न्हवे.

तर ह्या दोघा जय-विरुची आई सुहासिनी मुळे फारच आजारी पडते तिच्या उपचारांवरचा खर्च वाढतच असतो. अशातच पैसा म्हणजेच ह्या भुलभुलय्यातील ताकद आहे हा साक्षाक्तार झालेले विजय आणि याकुब आता मोठा हात मारायचा ठरवतात. त्यासाठी ते भुलभुलय्याच्या दादाचे सहहाय घेतात. आपल्याच वयाच्या चार/पाच मुलांना घेऊन हे दोघेही भरदुपारी एका सोनाराचे दुकान लुटतात आणि मोठा डल्ला मारतात. वचन दिल्याप्रमाणे दादा आपला हिस्सा न देत सगळाच माल घशात घालतोय हे पाहून दोघांचे रक्त खवळते, त्यातच दादा याकुबवर हात उचलतो आणि संतापाच्या भरात दादाच्याच बंदुकीतून विजय दादावर गोळी झाडतो. जखमी दादाला रस्त्यात सोडून दोघेही मालासकट पळ काढतात. इकडे दादाची जागा घ्यायचे स्वप्ने पाहणारा त्याचा उजवा हात ह्या संधीचा फायदा घेऊन दादाची हत्या करतो आणि आळ विजय आणि याकुबवर ढकलतो.



चोरी, खून, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची एकत्र शिक्षा म्हणून त्या दोघांनाही बाल सुधारगृहात पाठवले जाते. बाल सुधारगृहात फक्त १७ वर्षापर्यंतचे गुन्हेगार राहू शकत असताना इथे मात्र चक्क २०-२२ वर्षाची मुले आरामात राहतं असतात आणि 'के टी' नावाच्या एका त्यांच्याच वयाच्या बायल्याच्या हाताखाली टोळी देखील चालवत असतात. जी सुधारगृहात चरस विकून मुबलक पैसा कमावत असते. ह्या सगळ्याला आशीर्वाद असतो तो सुधारगृहाच्या वॉर्डनचा म्हणजेच नसिरुद्दिन शहाचा.

भुलभुलय्याच्या तालमीत तयार झालेले याकुब आणि विजय सुधारगृहात स्वस्तात चरस विकायला सुरुवात करतात आणि इथेच संघर्षाची ठिणगी पेटते. केलेल्या कृत्याचे फळ म्हणून इतर मोठ्या मुलांकडून मार तर मिळतोच वर नसिरुद्दिनच्या आशीर्वादाने त्यांना अनैसर्गिक अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते. ह्यातच सुहासिनी मुळे मरण पावते. एकमेकांना सावरत दिवस ढकलणारे याकुब आणि विजय योग्य संधी मिळताच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या 'के टी' चा खून करतात. खुनामुळे खळबळ माजल्याने एक कमिशन नियुक्त केले जाते, ज्यात खुनी कोण आहे हे कळत नाही पण इतर अवैध धंदे उघड झाल्याने वॉर्डनं नसिरुद्दिन शहाची मात्र हकालपट्टी होते. एक दिवशी सुधारगृहातून बाहेर पडून भुलभुलय्याचे बेताज बादशहा बनण्याचे स्वप्न पाहणारे याकुब आणि विजय आता सुधारगृहाचे भाई बनतात.



काही वर्षात (म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी) दोघेही सुधारगॄहातून बाहेर पडतात आणि उराशी जपलेले स्वप्न साकारायला पुन्हा भुलभुलय्यात हजर होतात. जुना मित्र रमेश (झाकीर हुसेन) च्या सहहायाने ते भुलभुलय्यामधील लहानग्या मुलांची एक टोळी तयार करतात आणि आपल्या काळ्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवतात. घरी दोन वेळ जेवणाचे वांदे असणाऱ्या पण हातात चित्रकलेची जादू असलेल्या सक्षम देशपांडे सारख्या कोवळ्या मुलांच्या ह्या टोळीत समावेश असतो. ह्या सर्वाची माहिती मिळाल्यावर भुलभुलय्यामध्ये एक छोटीशी शाळा चालवणारा आदर्श शिक्षक अश्विन परांजपे (अतुल कुलकर्णी) ह्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही. अतुल कुलकर्णीच्या पत्नीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांनंतर होणारे रुखसारचे दर्शन मन प्रसन्न करणारे. इथून पुढे सुरू होतो तो भुलभुलय्याच्या काळ्या साम्राज्यावर पकड घेण्याचा खेळ... आणि एका तद्दन गल्लाभरू चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटाची वाटचाल सुरू होते.



ह्यानंतर विजयच्या आयुष्यात संध्या (अंजना सुखानी) चे आगमन, हल्ल्याला प्रत्युत्तर देताना विजयच्याच गोळीमुळे सक्षम देशपांडेचा मृत्यू आणि त्यामुळे अंतर्बाह्य पालटलेला विजय अशा नेहमीच्या रस्त्याने गाडी निघते. चित्रपटाचा शेवट तर निव्वळ बकवास!!



विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे. कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते. याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे. हा याकुब, हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो. गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला, विकृत हसणारा, बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे. अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही.

तात्पर्य काय तर 'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. '



0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा